संजीव खाडे / कोल्हापूर
अंबाबाई मंदिराच्या शंभर मिटर अंतरावरील फेरीवाल्यांना आपल्या दुकानच्या दारात जागा देण्यास महाव्दार रोडसह ताराबाई रोड, जोतिबा रोडवरील व्यापाऱयांनी कडाडून विरोध केला आहे. पांढरे पट्टे मारून फेरीवाले आमच्या दारात बसले तर आमच्या दुकानात येणाऱया ग्राहकांची गाडी कुठे लावायची? आणि दोन फुटातून दुकानात कसा प्रवेश करायचा?, असा सवाल या व्यापाऱयांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने निर्णय घेताना आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही. तसेच विश्वासातही घेतलेले नाही, असा आरोप या व्यापाऱयांनी केला आहे. दरम्यान, या व्यापाऱयांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली असून महापालिकेच्या निर्णयालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे आता महापालिका आणि फेरीवाल्यांच्या संघर्षात आता दुकानदारांचाही समावेश झाला आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरापासून शंभर मिटरच्या अंतरच्या आतमध्ये महाव्दार रोड, ताराबाई रोड आणि जोतिबा रोडवर बसणाऱया फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या सर्व फेरीवाल्यांना मंदिरापासून शंभर मीटरच्या बाहेर महाव्दार रोड, ताराबाई रोड आणि जोतिबा रोडवरच 3 चौरस फुटाचे चौकोन आखून जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या तिन्ही रोडवरील दुकानांच्या दारात पांढरे पट्टे मारून चौकोन आखण्याचे काम सुरू केले आहे. रोडवरील दुकानात प्रवेश करण्यासाठी दोन तीन फुटांची जागा सोडून उर्वरीत दुकानाच्या समोर चौकोनात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास जागा देण्यात आली आहे. पण या ठिकाणी स्थलांतरीत फेरीवाल्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे महापालिका आणि फेरीवाल्यांत संघर्ष सुरू झाला आहे.
व्यापाऱयांचा कडाडून विरोध
महापालिका आणि फेरीवाल्यांत संघर्ष सुरू असताना स्वतःच्या दुकानच्या दारात फेरीवाल्यांना जागा देण्यास महाव्दार रोड, ताराबाई रोड आणि जोतिबा रोडवरील व्यापाऱयांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत एका व्यापाऱयाने तरुण भारतशी बोलताना सांगितले, आमचा फेरीवाल्यांना अथवा त्यांच्या व्यवसायाला विरोध नाही. पण निर्णय घेताना महापालिकेने आम्हाला विश्वासातच घेतलेले नाही. आमच्या अडचणीत, समस्या जाणून घेतल्या नाहीत. आमच्या दुकानाच्या दारात परंपरेने जे फेरीवाले आजवर गेली अनेक वर्षे व्यवसाय करत आहेत. त्यांना आम्ही कधीच विरोध केला नाही, आजही त्यांना आमचा विरोध नाही. पण आता अंबाबाई मंदिराच्या शंभर मिटरच्या आतील फेरीवाल्यांना आमच्या दारात आणून महापालिका बसवू लागली आहे. दुकानात प्रवेश करण्यासाठी दोन अडीच फुटांची जागा सोडून लगत फेरीवाल्यांसाठी पट्टे मारले आहे. उद्या हे फेरीवाले महापालिकेने जागा दिली म्हणून कायमचा हक्क सांगणार, आमच्या आणि त्यांच्याकडे येणाऱया ग्राहकांना अडचणी येणार, आमच्याकडे खरेदीसाठी येणाऱया ग्राहकाने त्याची गाडी, वाहन कुठे लावायचे?, त्यातून उद्या व्यापारी दुकानदार आणि दारात बसलेला फेरीवाला यांच्यात वादाचे प्रसंग घडू शकतात, असे अनेक प्रश्न तयार होणार आहेत. त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.
दोनवेळा रस्ता रूंदीकरणात जागा दिली ती कुणासाठी ?
महाव्दार रोड, ताराबाई रोड आणि जोतिबा रोडचे आजवर दोन ते तीनवेळा रस्ता रूंदीकरण झाले आहे. त्यावेळी या ठिकाणची दुकाने असोत वा घरे रूंदीकरणात हटविण्यात आली. दुकान, घरमालकांनी आपली जागा महापालिकेला दिली. विकासाच्या प्रक्रियेत आम्ही आमच्या जागा दिल्या. पण आज महापालिका आम्ही दिलेल्या जागेत फेरीवाल्यांना बसवत आहे. अडचण निर्माण करत आहे. त्याऐवजी आमच्या जागा आम्हाला द्या, अशी मागणीही या व्यापाऱयाने केली.
घरफाळा, लाईट बिल, पाणी बिल भरूनही त्रास
आम्ही व्यापारी दुकानात व्यवसाय करतो, लाखो कोटÎवधी रूपयांची गुंतवणूक करावी लागते, आम्हाला घरफाळा रेडिरेकनरच्या दाराने भरावा लागतो. लाईट बिल, पाणी बिल व्यावसायिक दराने भरावे लागते. महापालिकेची परवाना फी भरावी लागते. त्याचबरोबर शासनाचे इतर करही आहेत. दुकानात काम करणाऱयांचे पगार असोत वा मेटेनन्स असो, तो आम्हालाच भरावा लागतो. आज व्यवसाय करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते, अशा काळात व्यवसाय करणे कठिण बनले असताना उद्या जर आमच्याच दारात फेरीवाले येऊन बसणार असतील तर वादाचे प्रसंग घडण्याची भीती आहे. त्यातून व्यापारावर विपरीत परिणामाचा धोका आहे. रस्तारूंदीकरणात जागा देऊन, सर्व करत भरून व्यवसाय करत असताना आम्हाला नाहक त्रास नको आहे. त्यामुळे दारात फेरीवाल्यांना जागा देण्यास आमचा विरोध आहे, असे या व्यापाऱयाने सांगितले.
फेरीवाल्यांचे लाड नकोत
शासन जेंव्हा एखादी योजना आखते, त्यातून जागा अथवा घर देते तेंव्हा शासनाने केलेल्या नियोजनानुसार लाभार्थीला जागा, घर दिले जाते. त्याला उपलब्ध पर्यायातून निवड करावी लागते. अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांना सरस्वती टॉकीजजवळ महालक्ष्मी मार्केटजवळ यापूर्वी जागा दिली होती, पण फेरीवाल्यांनी त्याला विरोध केला. महाव्दार रोडच पाहिजे असा आग्रह धरला. काही फेरीवाल्यांचे महालक्ष्मी मार्केटमध्ये दुकानगाळे आहेत, पण ते महाव्दार रोडवर येऊन व्यवसाय करतात, काहींच तर महाव्दार रोडसह लगतच्या रोडवर तीन-तीन, चार-चार स्टॉल आहेत. याकडे महापालिकेचे लक्ष नाही. प्रामाणिक फेरीवाल्यांचे योग्य स्थलांतर करता तर चुकीचे करणाऱयांचे लाड करू नका, अशी प्रतिक्रियाही एका व्यापाऱयाने व्यक्त केली.
न्यायालयात याचिका, न्याय मिळेल
न्यायालयात याचिका दाखल करून आम्ही आमच्या व्यथा, वेदना मांडल्या आहेत. न्यायालय न्याय देईल, असा विश्वास व्यापाऱयांनी व्यक्त केला आहे.