भीती नको, काळजी हवी : टेस्टींग वाढवल्याचा परिणाम : ‘त्या’नंतर कदाचित ग्राफ येईल कमी
दीपक प्रभावळकर / सातारा
मार्चपासून सुरू असलेली कोरोनाची महासाथ काही केल्या ओसरण्याचे नाव घेईना. दिवसेंदिवस आकडे 200 च्या पटीने वाढत असताना हा चढता आलेख नक्की उतरणार तरी कधी? असा प्रत्येक मन-मेंदूमध्ये एकच प्रश्न आहे. मात्र पाच हजाराचा आकडा ओलांडलेला कोरोना ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 9,000 पर्यंतवर चढला असेल हा अंदाज सरकारच्या सांख्यिकी तज्ञांनी दिला आहे. दरम्यान, येणारा उत्सवांचा काळ… पुन्हा अंतरजिल्हा होणारा प्रवास… यामुळे हा आकडा शासनाने जरी 9 हजाराचा सांगितला असला तरी तो 10,000 च्या पुढेही जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, पुढील 20 दिवसांत चढय़ा आकडय़ांचा ट्रेंड राहिला तरी कोणीही भिऊन न जाता केवळ स्वतःची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अनलॉक झाले म्हणून बेफाम होऊन चालणार नाही. सध्या टेस्टींगचे प्रमाण दुप्पट केल्याने आकडे वाढते दिसत आहेत. ऑगस्टमध्ये सातारा जिल्हय़ाचा आलेख वाढताच राहणार असला तरी कदाचित तो ओसरण्याची शक्यता आहे, मात्र त्याला सरकारी दुजोरा मिळालेला नाही.
नक्की काय असेल ऑगस्टअखेरपर्यंतचे चित्र?
कोरोनाच्या संदर्भात कोणताही अंदाज विचारपूर्वकही व्यक्त केला जात नाहीये. मात्र, शासनाने काही ठोकताळे अभ्यासून त्यातून काही प्रेडेक्शन केली आहेत. त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हय़ात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 5 हजार 200 पेक्षा जास्त असेल. उपचारार्थ रूग्णांची संख्या ही 3 हजार 650 पेक्षा जास्त असेल तर एकुण बळींचा आकडा 300 पर्यंत जाऊ शकतो.
ऑगस्टअखेर एकुण बाधितांचा संभाव्य आकडा शासन 9 हजार म्हणत असले तरी तो 10 हजारपेक्षा जास्त असू शकेल अशी भीती इतर संस्थांकडूनही व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हय़ाने कोरोना बाधितांचा आकडा पाच हजारांच्या पुढे जाताना भयावह स्थिती अनुभवली आहे आणि अजूनही तशीच स्थिती आहे. भीती कमी होत असताना अजाणतेपणी काळजीपण कमी होताना दिसत आहे. रोज रात्री बाधितांचे येणारे आकडे हे धडकी भरवत असताना ‘हे असं कधीपर्यंत सुरू राहणार?’ असा दीनवाणा सवाल आपसूक विचारला जात आहे, की हा प्रश्न विचारणाऱयालाही याचे उत्तर कोणाकडेच नाही हे माहित आहे.
म्हणूनच शासनाच्या नियोजनानुसार व संभाव्य स्थितीचा आढावा घेण्याचा ‘तरुण भारत’ने प्रयत्न केला त्यात हे समोर आले की ऑगस्टअखेर बाधितांचा आकडा 9,000 ओलांडणार आहे. मग त्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
टेस्टींग दुप्पट केल्याने दररोज 200 येऊ लागलाय आकडा
सुरूवातीच्या काळात जिल्हय़ात टेस्टिंग करण्याला मर्यादा होत्या. मात्र कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्यानंतर टेस्टींगला वेग आला. कराडच्या कृष्णासह पुण्याच्या तीन संस्थांकडून टेस्टींग होत दररोज टेस्टींग 435 ते 480 पर्यंत होऊ लागले होते. मात्र जुलैच्या उत्तरार्धात या सर्व संस्थामधून रिपोर्ट घेऊनही जिल्हय़ाची परिस्थिती नियंत्रणात नव्हती. पुनवडी, दुदुस्करवाडी सारख्या गावांनी प्रशासनाचीच झोप उडवल्यानंतर आरोग्य यंत्रणेने टेस्टींगची संख्या थेट दुप्पट केली. याच मध्ये रॅपिड अँटीजेन चाचण्या आल्याने टेस्टींगचा वेगही खुपच वाढला आहे. यात अर्ध्या तासात रिझल्ट येत आहेत. वास्तविक, 27 जुलैपासून जिल्हय़ात साधारणतः दररोज 1,000 टेस्टींग करण्याचा मोठा निर्णय झाला आणि त्यापासूनच दररोज बाधित येणाऱयांचा आकडा शंभर ओलांडून 150 व आता 200 च्या पुढे गेला आहे.
आकडे वाढल्याने घाबरून जाऊ नये
आकडे वाढले म्हणजे नव्याने कोणी आलेले नाहीत तर जिल्हय़ातलेच इतके लोक आता आरोग्य यंत्रणेखाली आले आहेत, असा सकारात्मक अर्थ घेतला तर घाबरून जाण्यासारखे काही नसल्याचे लक्षात येईल.
दिल्ली-मुंबई नियंत्रणात आले तर सातारा का आहे अजून अनियंत्रीत?
सध्या पूर्ण दिल्लीत 10 हजारांपेक्षा कमी तर आक्राळविक्राळ पसरलेल्या मुंबईत 20 हजारांपेक्षा कमी रूग्ण उपचारार्थ आहेत. ही प्रचंड शहरे जर नियंत्रणात येत असतील सातारा का दिवसेंदिवस अनियंत्रीत होत आहे? या प्रश्नाला काही ठोस उत्तर नसले तरी मुंबई-दिल्लीत टेस्टींगचे प्रमाण वाढवल्यानेच तिथे कोरोना काहीसा नियंत्रणात आल्यासारखा आहे.
अन्य जिल्हय़ाच्या प्रमाणात सातारा जिल्हय़ात हे प्रमाण आला चांगलेच वाढले आहे. याशिवाय साधारणतः स्वातंत्र्यदिनाच्या आधी साताऱयात टेस्टींग लॅब होत असल्याने टेस्टिंगचे प्रमाण वाढेल आणि नियंत्रण आणण्याच्या दिशेने आपण जाऊ असा आशावाद जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी व्यक्त केला.
टीöटी-टी शिवाय कोणताच पर्याय नाही
कोरोनाच्या या काळात सध्या तीन ‘टी’वर जास्त काम करावे लागणार आहे. टेस्टींग, ट्रकींग, ट्रिटमेंन्ट या त्रिसुत्रीवरच कोरोना नियंत्रणात येणार असल्याने टेस्टिंगला जास्त महत्व आहे.
मोठय़ा कष्टाने साखळय़ा तोडल्यात, हेच आशादायक चित्र आहे
जिल्हय़ात सर्वत्र निराशेचे वातावरण असताना काही तरी आशादायक चित्र आहे का? याप्रश्नावर डॉ. गडीकर म्हणाले, हो नक्कीच आहे. अगदी सुरूवातीपासून निझरे, वनवासमाची, आगाशिवनगर व सध्याची जिहे, ब्राह्मणशाही वाई, पुनवडी अशा गावांमध्ये प्रचंड साथ असताना आपल्या आरोग्य यंत्रणांनी त्या अत्यंत क्लिष्ठ साखळय़ा तोडण्यात यश मिळवले आहे. अगदी ग्राऊंड लेवलवर काम करणाऱया आशा वर्कर असो की सामान्य कोरोनायोद्धा या सगळय़ांच्या प्रयत्नांतून हे घडलं आहे. त्या-त्या काळात भेदरलेल्या गावकऱयांना कधी कधी पुढे येऊन दिलेला प्रतिसादही तितकाच महत्वाचा आहे.
लक्षणं दडवणं हेही मॉर्टेलिटी वाढण्याचं मोठ्ठं कारण ठरत आहे
राज्याच्या व इतर जिल्हय़ांच्या प्रमाणात सातारा जिल्हय़ाचा मृत्यूदर मर्यादित आहे. उलट कोणत्याही अत्याधुनिक सुविधा नसताना कोवीड 19 च्या वॉर्डमध्ये काम करणाऱया डॉक्टर्सच्या अथक मेहनतीला मी दाद देतो. दिवसेंदिवस अनुभव वाढत असून त्यावर आता नियंत्रण ठेवत असलो तरी कोमॉर्बिड रूग्णांच्या शिवाय जे शेवटच्या क्षणी येत आहेत, त्यांच्यातला मृत्यूदर जास्त आहे. त्यामुळे तमाम जिल्हय़ातल्या जनतेला हात जोडून विनंती आहे की, ज्यांना कोणाला शंका येत आहे त्यांनी तातडीने आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा. ‘कोरोना झाल्याने जितका धोका आहे, त्यापेक्षा तो लपवल्याने जीवाचा धोका आहे’ हे साऱयांनी लक्षात ठेवावे, अशी डॉ. गडीकर यांनी पुन्हा विनंतीपुर्वक अक्षरशः आर्जव केली.
होम आयसोलेशनमुळे शासनावरील ताण कमी होईल
सध्या शासनावर व आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण आहे, हे साऱयांना माहित आहे. दिल्ली-मुंबई प्रमाणे जिल्हय़ा हेम आयसोलेशनची व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे रूग्णांना त्याचा लाभ होणार आहेच शिवाय शासनावरील मोठा ताण कमी होणार आहे. अत्यावश्यक रूग्णांना वेळीच, तातडीने उपचार करता येणार आहेत. मात्र, होम आयसोलेशनबाबत काही नियम आहेत तसेच काही निकष आहेत. ते पुर्णतः तपासूनच त्याला परवानगी देण्यात येणार आहे. दरम्यान, लोकांना मास्क वापरलेच पाहिजेत, हात वारंवार धुतलेच पाहिजेत, सोशल डिस्टंसिंग ठेवलेच पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केलाच पाहिजे…. सध्या हीच चार औषधे आहेत, असं मानून राहिलं तरी चालेल.