प्रतिनिधी/ सातारा
sसप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे कोरोनाशी लढाई करणाऱया आरोग्य यंत्रणेस काहीशी उसंत मिळाली असून यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. सप्टेंबर महिना संपत असताना कोरोनाचे सक्रीय रूग्णांचे प्रमाण 10 हजारावरून 5 हजारावर आले आहे. मृत्यूचे प्रमाणही घटलेले असून 30 दिवसात 45 मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, गुरूवारी रात्रीच्या अहवालात 198 नागरिकांचे अहवाल बाधित आले असून 234 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
1 सप्टेंबरला होते 10249 ऍक्टिव्ह रूग्ण
जिल्हय़ात कोरोनाची मंदावत असली तरी ती कमी होत नव्हती. सप्टेंबर महिन्यातील गणेशोत्सवापासून आकडे कमी होत आहेत. 1 सप्टेंबरला जिल्हय़ात 10249 इतके सक्रीय रूग्ण होते. 30 सप्टेंबरला हा आकडा 5387 इतका असून सुमारे 4862 सक्रीय रूग्ण कमी झाले आहेत. मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली असून 30 दिवसांत 45 मृत्यू झाले आहेत. काही दिवसांत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. बाधितांचा 1 सप्टेंबरचा आकडा 240077 इतका होता. यात सप्टेंबर महिन्यात 8486 रूग्णांची भर पडली आहे. तर 30 दिवसांत तब्बल 12 हजार 538 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सहा महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर दिलासादायक
गेले सहा महिने कोरोनाच्या दुसऱया लाटेचा मुक्काम जिल्हय़ात आहे. सुरूवातीच्या महिन्यात या लाटेचे रौद्र रूप जिल्हय़ाने पाहिले होते. त्यानंतर लाट ओसरत असली तरी तिचा वेग कमी आहे. सप्टेंबर महिन्यात मात्र जिल्हय़ाच्या स्थितीत प्रचंड सुधारणा झाली आहे. महत्वाचे म्हणजे मृत्यूदर आटोक्यात आला आहे. तर कोरोनामुक्ती वाढून सक्रीय रूग्ण निम्म्याने कमी झाले आहेत.
खटावला सर्वाधिक 51 बाधित
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 198 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले तर दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. यात खटाव तालुक्यात सर्वाधिक 51 रूग्ण वाढले आहेत. तर फलटणला 35 रूग्ण वाढले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट दोन दिवसांत वाढला होता. तो आता पुन्हा 2.57 टक्के झाला आहे.
सातारा तालुक्यात 32 रूग्ण
हॉटस्पॉट सातारा तालुक्यात 32 नवे रूग्ण आढळले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 5 (9962), कराड 16 (38872), खंडाळा 15 (14084), खटाव 51 (25527), कोरेगाव 10 (21771), माण 20 (17700), महाबळेश्वर 0 (4668), पाटण 1 (10089), फलटण 35 (36933), सातारा 32 (51188), वाई 9 (15667) व इतर 4 (2102) असे आज अखेर एकूण 248563 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.
234 जणांना डिस्चार्ज
संसर्ग मंदावल्याने गेले काही दिवस बाधितांपेक्षा रोज कोरोनामुक्त होणारांचे प्रमाण जास्त आहे. गेल्या चोवीस तासात जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 234 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर गेल्या चोवीस तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.