जिल्हा रुग्णालयातील प्रकार : मृत्यू दाखल्याकरिता करावी लागतेय धावपळ
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्यांचा मृत्यू दाखला घेण्यासाठी नागरिकांना जिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. मात्र, महिन्यानंतरही मृत्युची नोंद झाली नसल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या जन्म-मृत्यू विभागात सांगण्यात येत आहे. दाखले देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना धावपळ करावी लागत आहे.
महापालिका कार्यालयात जन्म व मृत्यू दाखले देण्यात येतात. पण जिल्हा रुग्णालयात जन्म किंवा मृत्यू झाल्यास त्याबाबतचे दाखले देण्याची सुविधा रुग्णालयात करण्यात आली आहे. जन्म व मृत्यू दाखल्याकरिता अर्ज केला असता आधार ओळखपत्र जोडण्याची सूचना करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून परगावच्या नागरिकांना याबाबतची माहिती नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हय़ातील विविध गावांतील महिला प्रसूतीसाठी व रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. परगावच्या नागरिकांना रुग्णालयाच्या नियमावलीची माहिती नसल्याने दाखले घेण्यासाठी फेऱया माराव्या लागत आहेत.
कोरोनाच्या उपचाराकरिता जिल्हय़ातील असंख्य रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. पण काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यास रुग्णालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागामधून दाखले घ्यावे लागत आहेत. पण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृत्युची नोंद महिन्यानंतरही झाली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला घेण्यासाठी आठ दिवसांपूर्वी अर्ज केला होता. पण मृत्युची नोंद झाली नसल्याची माहिती देऊन दोन दिवसांनंतर या शोधून ठेवतो, असे सांगून दाखला देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. मृत्यू दाखले देण्यात येणाऱया कक्षामधील कर्मचाऱयांना विचारले असता, व्यवस्थित उत्तरे देत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. महिन्यानंतरही मृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
एक वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हा रुग्णालयातील जन्म व मृत्यू दाखले महापालिका कार्यालयात दिले जातात. पण रुग्णालयातील जन्म-मृत्यूच्या नोंदी महापालिकेकडे पाठविण्यास विलंब होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याच नोंदी पाठविण्यात आल्या नसल्याची माहिती महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयांनी दिली. 2019 मधील जन्म दाखले अद्यापही महापालिका कार्यालयात उपलब्ध नाहीत. यामुळे नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात अर्ज केला असता, महापालिका कार्यालयात पाठविण्यात आले असल्याचे सांगून दाखले देण्यास टाळाटाळ चालविली असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा रुग्णालयात आंधळा कारभार चालला असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. जन्म-मृत्युचे दाखले तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने महापालिकेकडे हस्तांतर करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.