वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या प्लेऑफ लढती दरम्यान नेहमी घेण्यात येणाऱया महिलांच्या टी-20 चॅलेंज क्रिकेट स्पर्धेत तीन संघांचा समावेश राहणार आहे. महिलांची ही टी-20 चॅलेंज स्पर्धा प्रदर्शनीय म्हणून खेळविली जात असून यावेळी या स्पर्धेत चार संघांचा समावेश करण्याची योजना बीसीसीआयने आखली होती पण देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीचा विचार करून सदर स्पर्धा पूर्वीप्रमाणे तीन संघातच घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे आयपीएल स्पर्धेला विलंब झाल्याने ही स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेतली गेली. दरम्यान याच कालावधीत ऑस्ट्रेलियात महिलांची डब्ल्यूबीबीएल स्पर्धा घेतली जात असल्याने ऑस्ट्रेलियाचे खेळाडू महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी उपलब्ध होवू शकले नाहीत. पण यावर्षी महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेत तीन संघांचा समावेश करण्याचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. सदर स्पर्धा दिल्लीमध्ये होईल. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या तसेच इंग्लंडच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंची बीसीसीआयकडून चर्चा सुरू आहे. गेल्यावर्षी महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेत चार सामने खेळविले गेले. ही स्पर्धा शारजामध्ये घेतली गेली तर आयपीएल स्पर्धेतील प्लेऑफ लढती याच कालावधीत दुबईत झाल्या.
कोरोना महामारीमुळे भारताच्या महिला क्रिकेटपटूंना सरावाची संधी पुरेशी मिळाली नाही. तब्बल एक वर्षांनंतर गेल्या महिन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळल्या होत्या आणि या दोन्ही मालिका भारताला गमवावा लागल्या. 2021 च्या अखेरीस भारतीय महिला संघाला पहिली कसोटी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा आयोजित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पुढील वर्षीच्या प्रारंभी न्यूझीलंडमध्ये महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार असल्याने भारतीय संघाला सरावासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.