‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, देशाचा ऐतिहासिक ठेवा परत मिळविण्यात यश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात महिलांच्या नेतृत्वाचे गुणगान केले आहे. आकाशवाणीवरुन हा कार्यक्रम रविवारी प्रसारित करण्यात आला. आपल्या सरकारने अनेक सामाजिक अभियाने चालविली त्यांमध्ये महिला पुढाकार घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वात देश अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती साधत आहे, असे प्रतिपादन त्यांनी काय कार्यक्रमात केले.
तस्करीच्या मार्गाने भारतातून अनेक प्राचीन आणि ऐतिहासीक मूर्ती विदेशी गेल्या आहेत. त्या परत मिळविणे हे आपले कर्तव्य असल्याचे सरकार मानते. अशा 200 हून अधिक मूर्ती गेल्या काही महिन्यांमध्ये परत आणल्या गेल्या आहेत. या मूर्तींमध्ये तामिळनाडूतील भगवान आंजनेय्यर (हनुमान) ही मूर्ती महत्वाची आहे. ती 600ते 700 वर्षांपूर्वीची असून काही दशकांपूर्वी चोरीला गेली होती. ती परत मिळविण्याचे आव्हान होते. आता ती भारतात आणण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या 200 हून अधिक प्राचीन मूर्ती मिळविल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, इटली, हॉलंड, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर अशा देशांमधून त्या परत मिळविण्यात आल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या अनेक दशकांमध्ये या मूर्तींच्या सुरक्षेकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे त्या चोरीस गेल्या. या देशातून त्या देशात अशा विकल्या गेल्या. मात्र, केंद्र सरकारने प्रत्येक देशाच्या प्रशासनाशी संपर्क करुन त्या परत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. त्याला यश आल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून स्पष्ट केले.
इतर विषयांचाही उल्लेख
मन की बातमध्ये त्यांनी देशाने केलेल्या प्रगतीसंबंधीच्या इतर विषयांचाही उल्लेख केला. कोरोनाचे आव्हान असतानाही सरकारने आर्थिक प्रगतीकडे लक्ष दिले. कोरोनामुळे स्थलांतर करावे लागलेल्या गरीब लोकांना विनामूल्य धान्य देऊन त्यांच्या आहाराची सोय केली. तसेच देशव्यापी लसीकरणावर भर देऊन कोरोना रोखण्याचा प्रयत्न केला. लसीकरणाच्या अभियानामुळेच कोरोनाची धार बोथट झाली. आता देश वेगाने आर्थिक घोडदौड करु लागला असून आर्थिक विकासाची फळे तळागाळात पोहचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जनतेचा सरकारला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.