शारदोत्सव सोहळय़ात प्राची जावडेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /बेळगाव
‘सुंदराचा वेध लागो’ असे श्यामला वनारसे यांचे एक उत्तम पुस्तक आहे. दिसण्यापेक्षा आपण कशा आहोत किंवा कसे असायला हवे याचे फार मार्मिक विवेचन या पुस्तकात आहे. सौंदर्याची नेमकी व्याख्या जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. हा संदर्भ देण्याचे कारण म्हणजे शारदोत्सव सोहळय़ात प्राची जावडेकर यांनी ‘सुंदर मी होणार’ हा विषय मांडला. आणि सौंदर्य नेमके कशात आहे याचे विवेचन केले.
बाहय़ सौंदर्य हे खरे सौंदर्य नाही. आपले मत हाच आपला आरसा आहे. त्यामुळे सुंदरता हा मनाचा निर्धार आहे. अनेकदा महिला मी म्हणून सहन केले, गप्प बसले, मी फ्लॉप बाई, मला काही येत नाही असे नक्राश्रु ढाळत असतात. परंतु महिलांनी सहनही करू नये आणि वादही घालू नये तर वाद न घालता त्यांना संवादाचे पूल जोडता आले पाहिजेत असे त्या म्हणाल्या.
स्त्राr दाक्षिण्य म्हणत आपले स्त्रीत्व एन्कॅश करण्याचा प्रयत्न महिलांनी करू नये आणि मला सर्वकाही जमायला हवे असे अट्टाहास करणे सोडून द्यावे हे त्यांच्या व्याख्यानातील दोन महत्वाचे मुद्दे म्हणावे लागतील. आत्मभान असणे हेच खरे सौंदर्य हे वास्तव महिलांनी मात्र मनापासून स्विकारायला हवे. दिल्लीमध्ये आपण कमल सखी मंच स्थापन केला आहे. ज्या अंतर्गत खासदारांच्या पत्नी एकत्र येतात व अनेक उपक्रम राबवतात. अशी माहितीही त्यांनी दिली.
यानंतर शारदोत्सवाच्या माजी अध्यक्षा विजया धोपेश्वरकर, अंजली गाडगीळ, कुंदा बेळगावकर, मंगल गोगटे, आशा कुलकर्णी, डॉ. संध्या देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांच्या वतीने संध्या देशपांडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर 50 वर्षाचा आढावा घेणारी चित्रफीत अरूणा नाईक, संजीवनी खंडागळे व किर्ती दोड्डण्णावर यांनी सादर केली. प्रारंभी राष्ट्रसेविका समिती, मराठा महिला मंडळ, मुक्त नक्षत्र राष्ट्रसेविका मराठा महिला मंडळ यांनी लेझीमच्या जोशात पाहुण्यांचे स्वागत केले. प्रवेशद्वारावरील रांगोळी कविता गांगूर यांनी रेखाटली होती.