प्रतिनिधी/ रत्नागिरी
बचत गटाच्या चळवळीतून महिला स्वावलंबी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने आता महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील 150 बचत गटातील प्रत्येकी एक या प्रमाणे महिलांना चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील महिला बचतगटांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्यासाठी अध्यक्ष बने यांच्याकडून पाठपुरावा सुरु आहे. शासनाकडील उपलब्ध विकासनिधीतून जास्तीत-जास्त कामे व्हावीत, या दृष्टीने नियोजन केले जात आहे. विविध उपक्रमांसाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष महेश नाटेकर, आरोग्य सभापती बाबू म्हाप, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे यांचीही उपस्थिती होती.
या बैठकीत झालेल्या चर्चेत महिला बचतगटांतील महिलांना प्रशिक्षण देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून यासाठी 15 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. जिह्यातील अनेक महिला बचत गटांमार्फत विविध व्यवसाय करत स्वयंपूर्ण बनलेल्या आहेत. भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, शेळीपालन, कोकणी मेवा, विविध प्रकारची पिठं, गांडुळ खत निर्मिती, भात व नाचणीची शेती या माध्यमातून महिलांना रोजगार मिळत आहे. तयार केलेली उत्पादनं बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी गाडी आणि चालकांची गरज भासते. ही गरज ओळखून हे महत्वपूर्ण पाऊल जिल्हा परिषदेने उचलले असल्याचे अध्यक्ष बने यांनी सांगितले.
बचत गटातील महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी निर्णय
जिल्हय़ात असलेल्या बचत गटातील काही महिला दुचाकी चालवतात. मात्र चारचाकी चालवणे शक्य होत नाही. त्यासाठी गावातीलच कुणावर तरी अवलंबून रहावे लागते. या महिला सर्वच गोष्टींनी स्वयंपूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत गटातील या महिलांना चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.