प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ामध्ये लहान मुली तसेच महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याचबरोबर हुंडाबळीसारखे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या घटनांमुळे महिला तणावाखाली आल्या असून महिला व मुलींच्या संरक्षणासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाऊल उचलावे आणि महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचारविरोधी समितीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
देशामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत चालल्या आहेत. बेळगाव जिल्हाही त्यामध्ये अग्रेसर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बेळगावमध्ये अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याचबरोबर महिलांवरही लैंगिक अत्याचार होत आहेत. हे कोठे तरी थांबणे गरजेचे आहे. महिलांचे शोषण थांबवावे, त्यांना संरक्षण द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नियाज मुल्ला, विजय सांबरेकर, जुबेदाबी पठाण, समीना पिरजादे, जुनेद कोतवाल, आय. एम. कोतवाल, अबुशेमा कादरी, मुबारक काजी, साहेबलाल किल्लेदार, राहुल डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.