खासबाग येथील निराधार केंद्रातील प्रकारांबाबत तक्रारी वाढल्या
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने चालविण्यात येणाऱया निराधार केंद्रामध्ये गैरकारभार चालत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरात महिलांसाठी निराधार केंद्र स्थापन करण्यात आले नसल्याने खासबाग येथील निराधार केंद्रातील प्रकाराबाबत तक्रारी होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने गैरकारभाराची चौकशी करावी, तसेच महिलांसाठी निराधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महापालिकेच्यावतीने नाईट शेल्टरच्या नावाखाली निवारा केंदे सुरू केली होती. मात्र सर्व निवारा केंदे बंद करून महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत निराधार केंद्र सुरू करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार बेघर आणि निराधार नागरिकांसाठी आवश्यक सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्र सुरू करण्यात आले. 2015 पासून हे निराधार केंद्र कार्यरत आहे. हे केंद्र महापालिकेकडून चालविण्यात येत होते. पण या केंद्रात निराधारांची देखभाल करण्यासह अन्न-पाणी, औषधोपचार करण्यासाठी स्व-साहाय्य संघटनेची नियुक्ती करण्यात आली. याकरिता महिन्याला 65 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
नियमानुसार सकाळी नाष्टा आणि दुपारी व रात्री जेवणाची व्यवस्था करण्याबरोबरच निराधारांच्या औषधोपचारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र नियमानुसार कामकाज चालत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. याठिकाणी महिलांना प्रवेश नसतानादेखील महिलांना दाखल करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच दाखल झालेल्या महिलांकडून अर्जाच्या नावाखाली कोऱया कागदावर सही किंवा अंगठा घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी गैरकारभार चालत असल्याचा संशय बळावला आहे.
महिलांवर अन्याय
विविध संघटनांचे पदाधिकारी भटक्मया आणि बेघर नागरिकांना या ठिकाणी दाखल करतात. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. तर शहरात महिलांसाठी बेघर निराधार केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी महिलांना दाखल करण्यात येते. वास्तविक पाहता परवानगी नसल्याने त्यांना परत पाठविणे किंवा अन्य संस्थेत दाखल करण्याची सूचना करणे गरजेचे आहे. पण परवानगी नसतानाही महिलांना दाखल करून घेण्यात येत आहे. या ठिकाणी महिलांसाठी वेगळा कक्ष आणि महिला अधीक्षकांना नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे दाखल करण्यात आलेल्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या महिलांवर अन्याय झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
महापालिकेने केवळ पुरुषांसाठी निराधार केंद्र सुरू केले आहे. शहरात वेडसर किंवा दिव्यांग महिला व बेघर महिला फिरत असतात. त्यांच्यासाठी निराधार केंद्र सुरू करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. पण याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. मच्छे येथे केवळ भिकाऱयांना दाखल करण्याची परवानगी आहे. पण महिलांना या ठिकाणी दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे शहरात फिरणाऱया बेघर, भिकारी, दिव्यांग, मानसिक रुग्ण असलेल्या महिलांना दाखल करण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे खासबाग येथील निराधार केंद्रात महिलांना दाखल करण्यात येत आहे. परिणामी गैरप्रकार चालत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी महिलांसाठी निराधार केंद्र सुरू करण्याची गरज आहे. तसेच खासबाग येथील निराधार केंद्रात चाललेल्या प्रकाराची चौकशी होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सामाजिक संघटनांच्या विनंतीमुळे महिलांना आश्रय
महानगरपालिकेच्यावतीने चालविण्यात येणाऱया खासबाग येथील निराधार केंद्रात दररोज 28 ते 30 नागरिकांची देखभाल केली जाते. सार्वजनिक स्थळी अन्न-पाण्याविना उपाशीपोटी असलेल्या नागरिकांना सामाजिक संघटनेच्यावतीने निराधार केंद्रात दाखल करण्यात येते. काही बेघर आणि दिव्यांग नागरिकही या केंद्रात वास्तव्यास आहेत. ज्यांच्या पाठीमागे कोणीच नाही, असे नागरिक दररोज रात्री निराधार केंद्रात वास्तव्यास येतात. यापैकी काहीजण काम करतात. त्यामुळे सकाळी नाष्टा केल्यानंतर कामावर जातात. मात्र दिव्यांग असलेले नागरिक याच ठिकाणी राहतात. त्यांना सर्व सुविधा देण्याबरोबर औषधोपचार केले जातात. काहीवेळा शहरात अस्ताव्यस्त अवस्थेत फिरणाऱया महिला किंवा वयोवृद्ध महिला सामाजिक संघटनेच्या निदर्शनास आल्याने त्यांना निराधार केंद्रात दाखल करण्यात आले होते. पण त्या महिलांना महांतेशनगर येथील महिला निराधार केंद्रात दाखल केले होते. पण त्यापैकी एक महिला मानसिक रुग्ण असल्याने रात्री-अपरात्री ओरडत असे. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या. परिणामी त्या महिलांना खासबाग येथील केंद्रात हलवावे लागले. याठिकाणी महिलांना ठेवण्याची परवानगी नाही. पण सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱयांच्या विनंतीमुळे महिलांना ठेवण्यात आले, अशी माहिती निराधार केंद्राचे व्यवस्थापक शंकर मालेदार यांनी दिली.