भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाची अपेक्षा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महिलांतर्गत आयपीएल स्पर्धा 6 संघांमध्ये खेळवता येईल, इतकी गुणवत्ता भारतात निश्चितच आहे, असे प्रतिपादन भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने केले. रविचंद्रन अश्विनच्या यूटय़ूब चॅनेलवर ती बोलत होती. सध्या बीसीसीआय आयोजित करत असलेल्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हाज व व्हेलोसिटी असे 3 संघ समाविष्ट असतात.
टी-20 लीग स्पर्धा सुरु झाल्यानंतर पुरुष गटात स्थानिक खेळाडूंचा दर्जा उंचावला आहे. हाच प्रयोग महिला क्रिकेटमध्ये राबवल्यास त्याचीही उत्तम फलिते दिसून येऊ शकतील, असे 25 वर्षीय स्मृती याप्रसंगी म्हणाली. ‘पुरुषांची आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्थानिक खेळाडूंना मर्यादित प्रमाणात संधी मिळत असे. पण, आयपीएलमध्ये 8 संघांमधून स्थानिक खेळाडूंना बडे व्यासपीठ लाभले आणि यामुळे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सुसज्ज झाले’, असे तिने पुढे नमूद केले.
‘आज जी आयपीएल आहे, ती 10 किंवा 11 वर्षांपूर्वी अजिबात अशी नव्हती. हीच बाब महिला क्रिकेटला यापुढे लागू होऊ शकेल. सध्या देशभरात बऱयाच मुली क्रिकेट खेळत असतात. देशभरातील गुणवान खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी 5 ते 6 संघ खेळवण्यापासून सुरुवात करावी आणि एक किंवा 2 वर्षात ही संख्या आठ संघांवर आणावी’, याचा स्मृतीने उल्लेख केला.
‘जोवर आपण 5 ते 6 संघ खेळवत नाही, तोवर महिला क्रिकेटमधील गुणवत्ता दिसून येणार नाही. पहिल्याच टप्प्यात 8 संघांपासून सुरुवात करावी, असे मी अजिबात म्हणणार नाही. मात्र, यासाठी सुरुवात होणे आवश्यक आहे. जोवर आपण सुरुवात करणार नाही, तोवर देशातील महिला क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध होणार नाही’, असे ती एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली.
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर आपल्यात कसे उत्तम बदल झाले, याचाही स्मृतीने येथे उल्लेख केला. ती म्हणाली, ‘मी बिग बॅश लीगमध्ये 4 वर्षांपूर्वी खेळले आणि त्यामुळे माझ्या खेळात चांगले बदल झाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतील, असे 40 ते 50 क्रिकेटपटू सुसज्ज आहेत. हेच भारतीय क्रिकेटमध्ये देखील व्हायला हवे’.