वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अनुभवी महिला गोलरक्षक सविताकडे मस्कतमध्ये होणाऱया महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारताने 18 सदस्यीय संघांची घोषणा बुधवारी केली. यापैकी सोळा खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
नियमित कर्णधार राणी रामपाल बेंगळूरमध्ये दुखापतीतून बरी होत असल्याने तिची जबाबदारी सवितावर सोपविण्यात आली आहे. 21 ते 28 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भारतीय संघाचा गट अ मध्ये समावेश असून याच गटात जपान, मलेशिया, सिंगापूर यांचाही समावेश आहे. भारताची सलामीची लढत मलेशियाविरुद्ध पहिल्याच दिवशी होणार आहे. त्यानंतर जपान (23 जानेवारी), सिंगापूर (24 जानेवारी) यांच्याविरुद्ध सामने होतील. 26 जानेवारी रोजी उपांत्य लढती झाल्यानंतर 28 जानेवारी रोजी जेतेपदाची लढत होणार आहे. 2017 मध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत भारताने चीनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव करून जेतेपद पटकावले होते. येथील स्पर्धेतील अव्वल चार संघांना 2022 मध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. विश्वचषक स्पर्धा स्पेन व नेदरलँड्समध्ये होणार आहे.
भारतीय महिला संघ ः गोलरक्षक-सविता (कर्णधार), रजनी एतिमर्पू. बचावफळी-दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता. मध्यफळी-निशा, सुशीला चानू, मोनिका, नेहा, सलिमा टेटे, ज्योती, नवज्योत कौर. आघाडीफळी-नवनीत कौर, लालरेमसियामी, वंदना कटारिया, मारियाना कुजुर, शर्मिला देवी.