वृत्तसंस्था/ कौलालंपूर :
2022 मध्ये होणाऱया महिलांच्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. यावेळी सहभागी संघांची संख्या आठवरून 12 करण्यात आली आहे.
डिसेंबर 2022 मध्ये त्याची सुरुवात होऊन जानेवारी 2023 मध्ये त्याची समाप्ती होणार आहे. अहमदाबाद व नवी मुंबई ही या स्पर्धेची दोन संभाव्य केंद्रे आहेत, असे वृत्त गोल डॉट कॉमने दिले आहे. गेल्या फेब्रुवारीत एएफसी महिला फुटबॉल समितीने या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याची शिफारस केली होती. गुरुवारी त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आला.
यजमान देश असल्याने भारत आपोआपच या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. महिला आशियाई चषकाच्या यजमानसाठी भारत, चिनी तैपेई व उझ्बेकिस्तान यांच्यात चुरस लागली होती. पण समितीने अखेर भारतालाच पसंती दिली. भारतात दुसऱयांदा ही प्रमुख स्पर्धा आयोजित केली जाणार असून यापूर्वी 1980 मध्ये कोझिकोडे येथे पहिल्यांदा त्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघाने दोनदा (1980 व 1983) या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले आहे तर 1981 मध्ये कांस्यपदक मिळविले होते. 2003 मध्ये भारताने शेवटचे या स्पर्धेत भाग घेतला होता.
समितीने स्पर्धेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून आठ ऐवजी 12 संघांचा यावेळी सहभाग असेल. चार संघांचे तीन गट करण्यात येणार असून किमान 25 सामने होणार आहेत. यातील आठ संघ पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेचा किमान कालावधी 17 दिवसांचा ठेवण्याचे मान्य करण्यात आले असून 2023 महिला वर्ल्ड कपसाठी प्लेऑफ सामने आयोजित करण्याचा निर्णय प्रशासकीय समिती घेणार आहे.
भारताने याआधी 2017 मध्ये फिफा यू-17 पुरुषांची विश्वचषक स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली होती आणि यू-17 महिलांची विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी 2021 मध्ये भारतातच आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा यावर्षीच होणार होती. पण कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला.