– छत्रपती शासन महिला आघाडीची मागणी
– मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज वसुलीस स्थगिती देण्याच्या मागणीसाठी महिलांनी मोठयाप्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या मारला.
प्रतिनिधी / कोल्हापूर
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून सुरु असलेल्या कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी. वसुलीसाठी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱया मानसिक त्रासातून महिलांची सुटका करावी, यामागणीसाठी छत्रपती शासन महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला कर्जमुक्त झालीच पाहीजे, सरकार नाही भानावर, महिला उतरली रस्त्यावर अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मागण्याचे निवेदन आघाडी प्रमुख दिव्याताई मगदूम यांनी जिल्हाप्रशासनाला दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत ठिय्या मांडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी कर्जदार महिलांकडे तगादा लावला जात आहे. वसुलीसाठी त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत, मानसिक त्रास दिला जात आहे. यामुळे महिला मायक्रोफायनान्सच्या दहशतीखाली आहेत. कोरोनाच्या संकटात रोजगार उपलब्ध होत नसल्याने कर्जाचे हप्ते भरायचे कोठून असा प्रश्न महिलांसमोर आहे. मात्र सद्यपरिस्थितीचा विचार न करता साम,दाम, दंडचा वापर करुन कंपन्यांकडून कर्जवसुली सुरु आहे.
यापुर्वीही कंपन्यांकडून सुरु असलेल्या त्रासाची माहिती आघाडीकडुन जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिले होते. मात्र याबाबत प्रशासनाने कोणतेच ठोस असे पाऊल उचलले नाही. यामुळे कंपन्यांकडून अधिक तीव्र स्वरुपात वसुली सुरु आहे. महिलांना अरेरावी करणे, असभ्य भाषा वापरणे, अपमानास्पद वागणूक देणे, घरामध्ये ठिय्या मारुन बसणे असे प्रकार सुरु आहेत. यामुळे कर्जदार महिला भीतीच्या छायेखाली आहेत. त्यांना आधार देण्यासाठी मायक्रोफायनान्सची कर्ज पूर्णपणे माफ करुन वसुलीला स्थगिती देण्यात यावी, अन्यथा पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.