वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांना उपविजेतेपद मिळाले होते आणि त्यांना 5 लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले होते. त्यांना या बक्षिसाची रक्कम या आठवडय़ाच्या अखेरीस देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. या स्पर्धेतील कामगिरीनंतर महिला खेळाडूंना अद्याप बक्षीस रक्कम देण्यात आलेली नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर वरीलप्रमाणे सांगण्यात आले.
यासंदर्भात इंग्लंडमधील ‘टेलिग्राफ’ वृत्तपत्राने वृत्त दिले होते. भारतीय महिला संघातील खेळाडूंना बीसीसीआयकडून अद्याप बक्षीस वाटप करण्यात आलेले नाही, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संघटना फेडरेशनच्या एका पदाधिकाऱयाने सांगितल्याचे वृत्त या वर्तमानपत्राने दिले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ‘महिला संघातील खेळाडूंना त्यांच्या हिश्श्याची बक्षीस रक्कम या आठवडाअखेरीस मिळणार आहे. पैशांचे हस्तांतरण करण्यात आले असून ते त्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल,’ असे कार्यकारिणीतील एका सदस्याने सांगितले. बक्षीस देण्यास झालेल्या विलंबाबद्दल विचारले असता, आम्हालाच गेल्या वर्षी उशिराने रक्कम मिळाली होती. खेळाडूंना पैसे पाठविण्याच्या प्रक्रियेला सुमारे तीन ते चार महिने लागतात. मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या कारणास्तव बीसीसीआयचे मुंबईतील मुख्यालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पैशांचे हस्तांतरण होण्यास विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.