कॅनबेरा / वृत्तसंस्था :
महिला तिरंगी टी-20 मालिकेत भारताची लढत आज इंग्लिश महिला संघाविरुद्ध होत आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही तिरंगी मालिका महत्त्वाची ठरु शकते. ऑस्ट्रेलियन महिला संघाचा देखील या तिरंगी मालिकेत सहभाग आहे. आजच्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8.40 वाजता सुरुवात होईल.
भारतीय महिला संघ यापूर्वी 2017 वनडे विश्वचषक जेतेपदाच्या उंबरठय़ावर पोहोचला. पण, निर्णायक अंतिम लढतीत त्यांना इंग्लंडविरुद्ध 9 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर विंडीजमधील टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाला पुन्हा इंग्लंडविरुद्धच अपयशाचा सामना करावा लागला होता. आयसीसी स्पर्धेत निर्णायक टप्प्यात अपयशाला सामोरे जावे लागण्याची ही मालिका यंदा खंडित करण्याचे आव्हान यावेळी कर्णधार हरमनप्रीत कौर व तिच्या सहकाऱयांसमोर असणार आहे.
मुख्य प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांनी संघातील खेळाडूंकडून बेधडक खेळ करुन घेण्यावर अधिक भर दिला असून टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ही तिरंगी मालिका महत्त्वाची ठरेल, असे त्यांनीही स्पष्ट केले आहे. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात दि. 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत खेळवली जाणार आहे. भारताच्या गटात यजमान ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका यांचा समावेश आहे. स्पर्धेसाठी बंगालची नवोदित फलंदाज रिचा घोष हा एकमेव नवा चेहरा निवडण्यात आला आहे. रिचाने महिलांच्या चॅलेंजर चषक स्पर्धेत धमाकेदार फलंदाजी साकारली. त्याची ही पोचपावती मानली जाते.