वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नव्वदीच्या दशकातील भारतीय संघामधील उत्कृष्ट महिला क्रिकेटपटू ठरलेल्या नीतू डेव्हिड यांची बीसीसीआयने राष्ट्रीय महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हेमलता कला यांच्या जागी त्यांची नियुक्ती केली असल्याचे बीसीसीआयने सांगितले.
मिठू मुखर्जी, रेणू मार्गरेट, आरती वैद्य व व्ही. कल्पना या निवड समितीतील अन्य सदस्य असून त्या सर्व माजी क्रिकेटपटू आहेत. हेमलता कला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची चार वर्षांची मुदत मार्च 2020 मध्येच संपली होती. सुधा शहा, अंजली पेंढारकर, शशी गुप्ता, लोपामुद्रा बॅनर्जी या त्या समितीतील अन्य सदस्य होत्या. ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांनी शेवटची संघनिवड केली होती आणि भारताने त्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. ‘माजी लेगस्पिनर असलेल्या नीतू डेव्हिड सर्व सदस्यांत वरिष्ठ असल्याने त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपविले आहे,’ असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी
सांगितले.
नीतू डेव्हिड यांच्या नावे कसोटीच्या एका डावात सर्वाधिक बळी मिळविण्याचा विश्वविक्रम आहे. 1995 मध्ये जमशेदपूर येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटीत त्यांनी डावात 53 धावांत 8 बळी मिळविले होते. 10 कसोटीत त्यांनी एकूण 41 बळी मिळविले हेते. याशिवाय महिला वनडेमध्ये भारतातर्फे सर्वाधिक बळी मिळणाऱयांत त्या दुसऱया क्रमांकावर आहेत. त्यांनी 97 सामन्यांत 141 बळी मिळविले असून महिला वनडेत बळींची शतकी मजल मारणाऱया त्या पहिल्या भारतीय गोलंदाज
आहेत.
2008 मध्ये त्या निवृत्त झाल्या होत्या. भारतातील महिला क्रिकेटला संयुक्त अरब अमिरातध्ये तीन संघांच्या महिलांच्या चॅलेंजर मालिकेने सुरुवात होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयला नव्या निवड समितीची गरज असल्याने ही नियुक्ती करण्यात आली आहे.