प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प असताना मात्र मास्कची निर्मिती करणाऱया जिल्ह्य़ातील बचतगटांतील महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळाले आहे. गेल्या महिनाभरात जिल्हय़ातील एकूण 265 समूहातील 346 टेलरिंग व्यवसायाशी निगडित सदस्य महिलांनी सुमारे 2 लाख 30 हजार मास्कची निर्मिती केली. त्या विक्री व मोफत वाटपातून सुमारे 41 लाख 40 हजारांहून अधिक आर्थिक उलाढाल केली आहे.
कोरोना संसर्गामुळे एकाएकी शहरी भागात मास्कचा तुटवडा जाणवत असताना राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी कापडी मास्क निर्मितीचे काम हाती घेतले आहे. कॉटनच्या कपडय़ापासून तयार करण्यात येणारे हे मास्क सर्वसामान्यासाठी किफायतशीर ठरत आहेत. रोज धुवून ते वापरता येणार आहेत. यामुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात काही प्रमाणात ग्रामीण भागात बचत गटांतील महिलांच्या हाती काम मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून वर्षभर विविध साहित्य आणि उत्पादनाची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत अंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाच्या मार्केटींगसाठी जिल्हास्तरावर मार्केटींग अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या जगभर कोरोना विषाणूचा विळखा वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मास्कला मागणी आहे. अतिरिक्त मागणी आणि कमी उत्पादन यामुळे शहरी भागात मास्काचा काळाबाजार सुरू असल्याचे बोलले जाते. तर एकदा वापरून फेकून देण्यात येणाऱया (युज ऍण्ड थ्रो) मास्कच्या किंमतीत ग्रामीण भागात महिला बचत गटांनी तयार केलेल्या कॉटनच्या मास्कला मागणी वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी जिल्हय़ातील उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला, महिला समूह, समुदाय संसाधन व्यक्ती व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिल्याचे ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, रत्नागिरी यांच्यामार्फत सांगण्यात आले.