आता 10 ऐवजी 20 लाखांपर्यंत हमीविना कर्ज : मोदी सरकारची महिलांना मोठी भेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वावलंबी नारी-शक्ती कार्यक्रमात भाग घेतला. यादरम्यान त्यांनी महिला बचतगटांसाठी 1,625 कोटींची रक्कम जारी केली. अन्नप्रक्रिया, महिला शेतकरी उत्पादक संघ किंवा इतर बचत गटांशी संबंधित उद्योगांना चालना देण्यासाठी या निधीचा वापर करता येणार आहे. या निधींतर्गत सेल्फ हेल्थ ग्रुपला हमीशिवाय 10 लाखांऐवजी 20 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच बचत गटांच्या बँक खात्यासंदर्भातील जटील नियम व अटी काढून टाकण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनशी संबंधित महिला बचत गटांच्या महिला सदस्यांशी संवाद साधत वाढीव अनुदान निधीची घोषणा केली. यावेळी महिलांमध्ये उद्योजकतेची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पात अधिक सहभागासाठी मोठी आर्थिक मदत जारी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या निधीच्या आधारे महिलांनी ई-मार्केट प्लेसचा लाभ घ्यावा. उत्पादन थेट ग्राहकाला विकण्याचा ध्यास मनी बाळगून आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
कोरोनाकाळातील नारीशक्तीच्या कार्याचा गौरव
‘कोरोना काळामध्ये विविध बचतगटांमध्ये सक्रिय असलेल्या माता-भगिनींनी देशवासियांची केलेली सेवा अभूतपूर्व आहे. मास्क आणि सॅनिटायझर बनवणे, गरजूंना अन्न पुरवणे, जागरुकता कार्य अशा सेवांमध्ये आपल्या सखी गटांचे योगदान अतुलनीय आहे’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा काळ नवीन ध्येय ठरवण्याचा आणि नवीन ऊर्जा घेऊन पुढे जाण्याचा आहे. भगिनींची ताकद नव्या ताकदीने पुढे नेली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यातून आर्थिक प्रगती
महिलांची आर्थिक प्रगती सुरू असल्याचा दावाही पंतप्रधानांनी आपल्या संवादावेळी केला. तुम्ही सामाजिक कार्य करू शकता का? आपल्या परिसरातील इतर महिलांना कुपोषणामुळे येणाऱया समस्यांविषयी जागरुक करण्यासाठी तुम्ही हे अभियान चालवू शकता. सध्या देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. तुम्ही स्वतः देखील लस घ्या आणि इतर लोकांना देखील प्रेरित करा. तुम्ही तुमच्या गावात हे ठरवू शकता की तुम्ही या 15 ऑगस्ट ते पुढील 15 ऑगस्टपर्यंत वर्षामध्ये किमान 75 तास स्वच्छता, जलसंधारणाची कामे कराल, असेही पंतप्रधान म्हणाले.
महिलांच्या विकासासाठी विशेष योजना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन या योजनेंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱया गरीब कुटुंबांना बचत गटांमध्ये टप्प्याटप्प्याने समाविष्ट केले जाणार आहे. या योजनेंतर्गत महिलांना त्यांचे उत्पन्न आणि राहणीमान सुधारण्यासाठी दीर्घकालीन आधार देते. स्वयंसहाय्यता गटांच्या प्रशिक्षित महिला मोहिमेतील अनेक कामे हाताळतात. या प्रशिक्षित महिलांना कृषी सखी, पशु सखी, बँक सखी, विमा सखी असे संबोधले जाते. त्यांच्यामार्फत बचत गटांतील महिलांना घरगुती हिंसा, महिला शिक्षण, आरोग्य, पोषण आणि स्वच्छता याबाबत जागरुक केले जाते.