नवी दिल्ली : विश्वचषक जिंकण्याचा दुष्काळ संपवायचा असेल तर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखी मानसिक कणखरता अंगी बाणवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने केले.
पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला संघ आयसीसीच्या विविध स्पर्धांत बाद फेरी गाठण्यात यशस्वी होताहेत, पण ट्रॉफी जिंकण्यात त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. आजपर्यंत एकदाही भारतीय महिलांना विश्वचषक पटकावता आलेला नाही. निर्णायक टप्प्यातील कमकुवत मानसिकता हे त्याचे कारण आहे. जेतेपद मिळविण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असे मात्र अजिबात मानले जाऊ नये. गेल्या तीन वर्षात आपला संघ खूप चांगले प्रदर्शन करतोय. ऑस्ट्रेलिया याबाबतीत फार पुढे असून निर्णायक टप्प्यावरील सामने जिंकण्याची कला त्यांना चांगली अवगत झाली आहे,’ असे महिला वनडेत सर्वाधिक बळी मिळविणारी झुलन म्हणाली.
भारताने तिरंगी मालिका व टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला साखळी फेरीत हरविले होते. पण अंतिम लढतीत दोन्ही वेळेस भारताला त्यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
‘साखळी फेरीत पराभव झाला तरी त्याची भरपाई करण्याची संधी मिळणार, याची जाणीव असते. पण बाद फेरीत तसे करता येत नाही. अशावेळी कौशल्यापेक्षा मानसिकता मोठी भूमिका बजावते. तुमची मानसिक कणखरता, मनाचा समतोल राखण्याची क्षमता याच टप्प्यात दिसून येते. त्यात यश मिळाल्यास इतर संघांपेक्षा तुम्ही निश्चितच पुढे जाऊ शकता,’ असे झुलन पुढे म्हणाली.
‘फक्त महिला संघच नव्हे तर पुरुष व यू-19 संघही अलीकडे अंतिम लढतीत पराभूत झाले आहे,’ असेही ती
म्हणाली. अलीकडे झालेल्या पुरुषांच्या यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पराभूत झाला होता तर 2013 नंतर पुरुष संघाला एकही टायटल जिंकता आलेले नाही, त्या संदर्भात ती बोलत होती. ऑस्ट्रेलियन महिलांच्या यशात महिला बिग बॅश लीगने महत्त्वाची भूमिका बजावली असून भारतातही महिला टी-20 लीग सुरू होण्याची गरज असल्याचेही ती म्हणाली