महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प उद्धाटन सोहळा संपन्न
प्रतिनिधी/ सातारा
महिलांवरील वाढते अत्याचार याला आळा बसवण्यासाठी कायदे कडक करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सातारा जिह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प ही सुरू होत आहे. यामुळे महिलांना आणखी बळ मिळणार आहे. कोणतेही संकट आले तरी आपण तुळजाभवानी, अंबाबाई यांच्या पुढे हात जोडतो. जिजाऊ, अहिल्यादेवी, सवित्रीमाई यांच्या कार्याचा गौरव करतो. मात्र समाजातील महिलांचा आपण सन्मान करत नाही. महिलांवर होणारे अत्याचार हे थांबविण्यासाठी कायदे कडक करावे लागतात. ही लाजिवाणी बाब आहे. असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प ऑनलाईन उद्घाटन सोहळयाप्रसंगी बोलत होते. यावेळी अप्पर मुख्य सचिवगृह मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलीस महानिरिक्षक राजवर्धन, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उप पोलीस अधिक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, नगराध्यक्षा माधवी कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. महिलांनी आपल्या पर्स मध्ये रामपूरी ठेवावा. या कार्यक्रमाप्रसंगी मला त्यांचे वाक्य आठवले. माता-भगिनी या दुर्बल नाहीत. महिलांनी छेडछाडीविरूद्ध आवाज उठविला पाहिजे. हा उपक्रम सुरू करण्यात आल्याने जिह्यातील महिलांना लढण्यासाठी आणखी ताकद मिळणार आहेत. हा उपक्रम नक्की यशस्वी होणार आहे. जिह्यातील महिलांचे अनुकरण राज्यातील तसेच देशातील, जगातील महिलांनी केले पाहिजे.
यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे म्हणाले, हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. महिलांवरील अत्याचार तसेच महिला सक्षमीकरणासाठी उचलेले गेलेले पाऊल इतरांनाही प्रेरणा देणारे आहे. सातारा जिल्हा पोलीस दलाचे मी अभिनंदन करतो. आणि हा उपक्रम यशस्वी पणे पार पाडावा अशा शुभेच्छा देतो.
गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभुराज म्हणाले, महिलाच्या संदर्भात अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला आळा बसवण्यासाठी पाच नवीन मुद्दे घेवून नवीन प्रकल्प जिह्यात राबवत आहे. चारर्शिट दाखल करणे, आरोपीला लवकर अटक करणे, तपासाची गती वाढविणे, शासनाकडून पिडितेला लवकर मदत पोहचविणे, आरोपीला कडक शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. पोलीसांचा धाक वाढला पाहिजे. यासाठी कॉलेज, प्रायव्हेट क्लासेस मध्ये जावून सैरक्षणाचे धडे देणार आहे. या प्रकल्पाला सुरूवात झाली असून येत्या दोन महिन्यात यांची कडक अंमलबजावणी करणार आहे. आणि तिसऱया महिन्यांचे यांचे चांगले परिणाम सर्वांना दिसतील. त्यानंतर यांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे.
पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले, हा नावीन्यपूर्ण उपक्रम महिला सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून बनवण्यात आलेला आहे. यामुळे महिलांनी न घाबरता अन्यायाविरूद्ध आवाज उठविला पाहिजे. तसेच येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले.