अपघातात एक ठार तीन गंभीर जखमी- पोलीसात तक्रार दाखल
प्रतिनिधी / वाई
वाई – मांढरदेव घाटातील माळ नावाच्या शिवारात बोअरवेल मशीनच्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होवून झालेल्या अपघातातील गंभीर जखमी गंगाप्रसाद दशरथ यादव (वय 21, रा. दिवागडी सराई, सारे सिंगरीली, मध्यप्रदेश) याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर ट्रकमधील इतर तीघे जण गंभीर जखमी झाले.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बालेघर येथे बोअरवेल मारून दि. 18 रोजी मध्यरात्री परतत असताना मांढरदेव घाटामध्ये बोअरवेलचे कामगार व साहित्य घेवून निघालेला ट्रक क्रं. एम एच 11 एम 3571 यावरील चालक संताजी दत्तू साळुंखे (रा. पिंपरी, रहिमतपूर, ता. कोरेगाव) याचा घाट उतरत असताना तीव्र उतारावर ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक चालकाच्या डाव्या बाजूस डोंगर कठडयाला धडकून जाग्यावरच पलटी झाला. या अपघाताची माहिती पोलीस पाटील पोपट कोचळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली. त्यावेळी वाईचे पीएसआय संजय मोतेवार, शिवाजी वायदंडे, धुळे यांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय वाई येथे पाठविले. अपघातातील गंभीर जखमी गंगाप्रसाद यादव याला सातारा येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर इतर जखमी उदय नारायण सिंह (वय 21, रा. बलजोर बम्हणी, पैंडारा पुरेल सिंगरौली, मध्यप्रदेश), झगलु सुकनतिया धनुहार (वय 19, रा. आरमज रामसाय, मकान नं. 46, धनुहारपारा धुमानीडाड, पोस्ट जटगा, छत्तीसगड) यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतची पोलीस पाटील पोपट सर्जेराव कोचळे यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास पीएसआय संजय मोतेवार व शिवाजी वायदंडे हे करीत आहेत.