कणकुंबी येथे झालेल्या दोन्ही राज्यांतील देवस्थान प्रमुखांच्या बैठकीत निर्णय
वार्ताहर / कणकुंबी
कणकुंबी येथे दर 12 वर्षांनी होणाऱया गंगा-भागिरथी श्ा़खाr माउली देवींच्या भेटीचा सोहळा म्हणजे यात्रोत्सव फेब्रुवारी 2022 मध्ये भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कणकुंबी, चिगुळे, कोदाळी, कळसगादे आणि गुळंब येथील देवस्थान प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला.
कणकुंबी येथील श्री माउली देवी मंदिरात चिगुळे, कणकुंबी, कोदाळी, कळसगादे आणि गुळंब येथील श्री माउली देवस्थान प्रमुख व्यक्तींची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कणकुंबी माउली विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक बबन दळवी होते. दर 12 वर्षांनी गंगा-भागिरथी यात्रोत्सव म्हणजे श्री माउली देवांच्या भेटीचा सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडतो. 2009 मध्ये हा यात्रोत्सव पार पडला होता. यावर्षी कोरोनामुळे सर्व जगावरच महाभयंकर संकट उभे राहिलेले आहे. सर्व भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोनाच्या संकटामुळे 2021 मध्ये की 2022 मध्ये यात्रेचे आयोजन करावे, या विषयी कणकुंबी, चिगुळे, कोदाळी, कळसगादे आणि गुळंब येथील देवस्थान प्रमुखांची दोन-तीनवेळा बैठक बोलाविण्यात आली होती. परंतु अखेर सर्व ग्रामस्थांनी कोरोनाचा विचार करून बारा वर्षीय माउली देवींचा भेटीचा सोहळा फेब्रुवारी 2022 मध्येच भरविण्याचा निर्णय बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला.
वास्तविक दर 12 वर्षांनी कणकुंबी आणि चिगुळे येथील श्री माउली देवींच्या जलकुंडातील पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र येते. बारा वर्षांनी जेंव्हा गुरु मकर राशीत प्रवेश करतो, त्यावेळी तीर्थकुंडातील पाण्याची पातळी एक-दोन फुटांनी वाढते. आणि पाणी पांढरे शुभ्र होते. यालाच गंगा-भागिरथी अवतरली असे म्हणतात. यावेळी देवस्थानच्या प्रमुखांकडून गंगापूजन केले जाते आणि त्याचवर्षी बारा वर्षांनी हा यात्रोत्सव साजरा केला जातो.
कणकुंबी येथील कळसानाला प्रकल्पाच्या खोदाईमुळे कणकुंबी येथे गंगा-भागिरथी अवतरली नाही. मात्र चिगुळे येथे शिमगोत्सव दसरोत्सवात गंगा-भागिरथी अवतरली होती. त्यामुळे यावर्षी यात्रा भरवावी की, पुढील वर्षी असा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सर्व ग्रामस्थांच्या आणि देवस्थान प्रमुखांच्या चर्चेअंती देवीला प्रसाद लावून यात्रा भरविण्यासंबंधीचा कौल घ्यायचे ठरले. त्यानुसार देवीला प्रसाद लावण्यात आला. आणि अखेर सदर 12 वर्षाचा यात्रोत्सव फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
प्रारंभी कणकुंबी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष ऍड. रघुनाथ दळवी यांनी प्रास्ताविकात यात्रोत्सवाबद्दल मार्गदर्शन करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी कोदाळी गावचे (महाराष्ट्र) देवस्थान प्रमुख शंकर गावडे, पुंडलिक शिवाजी गावडे, वामन गवस, कृष्णा गावडे, विठ्ठल दळवी, शंकर नाईक, जीवन कांबळे व रामकृष्ण गावडे, चिगुळे गावचे रामचंद्र गावडे, गोंविंद गावडे, वासुदेव चौगुले, वामन हरिजन, तिम्मा गवस, तुकाराम चौगुले तसेच कणकुंबीचे राजाराम गावडे, लक्ष्मण गावडे, हणमंत गावडे, नारायण गुरव, प्रभाकर पंडित, नंदकुमार गावडे, भिवा घाडी, अंकुश गावडे, काका घाडी तसेच कळसगादा गावचे पुंडलिक दळवी, उमाजी दळवी, आप्पा गवस, गोपाळ दळवी, नामदेव दळवी, अर्जुन गवस तसेच गुळंब गावचे अर्जुन दळवी, सातू दळवी, देवदास गावडे व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कणकुंबी, चिगुळे, कोदाळी, कळसगादे व गुळंब येथे श्री माउली देवींची श्रद्धास्थाने असून या पाच देवींच्या भेटीचा सोहळा नयन्यरम्य असते. कोदाळी, कळसगादे आणि गुळंब या देवींची पालखी सहय़ाद्रीच्या डोंगर माथ्यावरून पायी चालत केंद्र (महाराष्ट्र) मार्गे चिगुळे गावी येते. त्या ठिकाणी एक मुक्काम करून दुसऱया दिवशी कोदाळी आणि चिगुळे देवींची पालखी कणकुंबी माउली देवीला भेटण्यासाठी येतात. चिगुळे-कणकुंबी दरम्यान असलेल्या धुळीचा वरंडा या ठिकाणी भेटतात. श्री माउली देवींच्या भेटीचा ऐतिहासिक व पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. असा हा नयनरम्य सोहळा पाहण्याचा योग फेबुवारी 2022 मध्ये येणार आहे.