रामायण महाभारतातील काव्यातून जे नाटय़पूर्ण प्रसंग रंगवलेले आहेत त्यांच्या घागऱया श्रीगणेशाच्या पायात आहेत. त्या काव्यातून जे नाद निघतात तसेच लयबद्ध नाद श्रीगणेशाच्या पायांच्या हालचालीतून त्याच्या घागऱयातून येत आहेत. पुढे माऊली म्हणतायत ,
तेथ व्यासादिकांच्या मती । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ।। 9 ।।
वरील महाकाव्ये रचणाऱया वाल्मिकी व व्यास यांच्या नवनवोन्मेषशालिनी बुद्धीचा शेला श्रीगणेशाच्या कंबरेला बांधलेला आहे.
कवीची प्रतिभेला म्हणजे काव्यनिर्माण करण्याच्या अलौकिक शक्तीला नवनवोन्मेषशालिनी बुद्धी असे म्हणतात. प्रतिभा कवीचे मुख्य भूषण असते. अशा प्रतिभेच्या तेजाचा संचार झाल्याने कवीनी केलेली विविध प्रसंगांची वर्णने जिवंत भासतात. अशा नवनवोन्मेषशालिनी बुद्धीचा शेला बुद्धिदात्या गणेशाच्या कंबरेला बांधलेला आहे. सहाजिकच त्या शेल्याचे पदर झळाळत आहेत.
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति ।
म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधे हाती ।।10 ।।
श्रीगणेशाच्या हाताबद्दल आणि हातातील शस्त्रांबद्दल सांगताना माऊली म्हणतायत, सहा शास्त्रांनी श्रीगणेशाचे सहा हात तयार झाले आहेत. त्या हातातील शस्त्रे जरी विसंवादी असली तरी शोभून दिसत आहेत. मीमांसा, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, वेदान्त ही आपली सहा सनातन शास्त्रे आहेत. त्या शास्त्रात मांडलेले सिद्धांत परस्परविरोधी आहेत. त्यांनी एकमेकांच्या सिद्धांताचे खंडन मंडन केलेले आहे. तद्वत श्रीगणेशाच्या सहा शास्त्ररुपी हातातली शस्त्रे जरी एकमेकाशी विसंवादी असली तरी श्रीगणेशाच्या हातात शोभून दिसत आहेत.
क्रमशः गणेश भक्त