बेंगळूर/प्रतिनिधी
तामिळनाडू-सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प वनक्षेत्र मार्गे तामिळनाडूत माओवादी घुसखोरी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तामिळनाडू-कर्नाटक सीमेवर काही भागात सुरक्षा वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. दरम्यान थालावाडी, हसनूर, भवानीसागर, कदंबूर आणि बर्गूर या सीमा पोलीस ठाण्यांवर सशस्त्र पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांनी केवळ वनक्षेत्रातील दहा तामिळनाडू-कर्नाटक सीमा चौकींवर अतिरिक्त सशस्त्र रक्षक उपलब्ध करून दिले आणि एरोड जिल्हा जंगलांमार्फत तामिळनाडूत कोणत्याही माओवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी चोवीस तास निरीक्षण केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक व्ही. शशी मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र राखीव पोलिसांमध्ये दहा खास प्रशिक्षित कमांडो जवानांची निवड करण्यात आली आहे आणि दक्षता ठेवण्यासाठी त्यांना सशस्त्र पोलिसांसह जंगलात पाठवले जाईल.