बड्या भांडवलदारांना अब्जावधी रुपयांची सवलत देताना देश आर्थिक संकटात नसतो का? – कॉ.आडम मास्तरांचा सवाल
सोलापूर /प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोच्यावतीने 16 जून रोजी केंद्र आणि राज्य सरकार च्या विरोधात देशव्यापी निषेध दिन पाळण्याची हाक देण्यात आली त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 16 जून रोजी सकाळी सोलापूरातील माकप च्या वतीने माजी आमदार, ज्येष्ठ कामगार नेते माकप चे राज्य सचिव कॉ. नरसय्या आडम ( मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 30 ठिकाणी माकप शाखांच्या मार्फत खालील मागण्या घेऊन देशव्यापी निषेध दिन पाळण्यात आला.
१. इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत.
२. सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे.
३. मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे. शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा. बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा.
४. राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या.
यावेळी बापूजी नगर येथे निषेध व्यक्त करताना कॉ नरसय्या आडम (मास्तर) म्हणाले की, आज देशात आधीच बेरोजगारीने विक्राळ रूप धारण केले होते; त्यात लॉकडाऊनने १५ कोटी कामगारांना बेरोजगार केले आहे. देशातला मोठा जनविभाग उपजीविकेच्या साधनांपासून पूर्णतः वंचित झाला आहे. आपल्या घरांकडे पायी चालत जात असलेल्या मजुरांची काळीज फाडणारी उपासमार पाहून जनतेची काय अन्नान्नदशा झाली आहे, हे दिसत आहे. जनतेवर अशी दारूण परिस्थिती लादणाऱ्या सरकारचा देशभर सर्वत्र निषेध केलाच पाहिजे, असा निर्णय पॉलिटब्यूरोने घेतला आहे.प्रशासनाने लागू करण्यात आलेले नियम काटेकोरपणे पाळूनच आणि शारीरिक अंतर राखत, मास्कचा वापर करत रस्त्यावर येऊन निषेध केलेला आहे
धनदांडगे आणि बड्या भांडवलदारांना अब्जावधी रुपयांची सवलत देताना आर्थिक संकटाचा सूक्ष्म विचार अर्थतज्ञांकडून का केला जात नाही ? असा सवाल केला.गरिबांचे प्रश्न म्हटले की, देश आर्थिक संकटात आहे अशी चिंता व्यक्त केली जाते.ही निंदनीय बाब आहे. जर सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आगामी काळात सरकारच्या विरोधात आरपार ची लढाई करणार असल्याचा इशारा आडम यांनी दिला.