शेळ-मेळावली आंदोलनकर्त्यांचा पुन्हा एकदा सरकारला इशारा : आजपासून पुन्हा एकदा आंदोलन
प्रतिनिधी /वाळपई
यावषी पूर्ण गोवाभर गाजलेल्या शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पविरोधी आंदोलन अजूनही शमलेले नाही. आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले फौजदारी खटले त्वरित मागे घेणे. आयआयटी प्रकल्पाच्या नावावर केलेली जमीन त्वरित रद्दबातल करणे आदी मागण्यांसाठी काल दिवसभर ग्रामस्थांनी पंचायतीच्या समोर आंदोलन केले. या मागण्यांवर दोन दिवसांत सरकारने निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. यामुळे मेळावली आयआयटी प्रकल्पविरोधी आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्मयता आहे.
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रात येत असलेल्या शेळ मेळावली या ठिकाणी साडेतीन हजार कोटी खर्च सरकारने आयआयटी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन तीव्र झाल्यानंतर सरकारला शेवटी आपला निर्णय मागे घ्यावा लागला व हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करावी लागली. सदर आंदोलन गोवाभर पेटले होते. आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय पक्षांनी पाठिंबा व्यक्त केला होता. सदर आंदोलन जवळपास चार-पाच महिने चालले होते. या आंदोलनाच्यावेळी एकूण 40 आंदोलनकर्त्यांवर सरकारने फौजदारी खटले दाखल केले होते. सदर खटले त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी अनेकवेळा सरकारकडे करण्यात आली होती. मात्र त्याची गंभीर दखल सरकारने अजूनही घेतलेली नाही. त्याचप्रमाणे सरकार मालकीची दीड लाख चौरस मीटर जमीन सरकारने आयआयटी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाच्या नावावर केली होती. सदर जमीन सरकारने पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सदर प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी कालपासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे व जमिनी संदर्भाची सविस्तरपणे माहिती देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन ग्रामस्थांनी गुळेली पंचायतीला 9 डिसेंबर रोजी सादर केले होते. याबाबतची माहिती 12 डिसेंबर रोजी होणाऱया ग्रामसभेमध्ये देणार असल्याचे पंचायत मंडळाने स्पष्ट केले होते, मात्र सदर माहिती ग्रामस्थांना मिळू शकली नाही. यामुळे 19 डिसेंबर रोजी आयोजित ग्रामसभेमध्ये मोठय़ा प्रमाणात ग्रामस्थांनी हजेरी लावून आक्रमक रूप धारण केले. यावेळी विद्यमान सरपंच गैरहजर राहिल्या तर उपसरपंच नितेश गावडे यांनी ध्वजारोहण करून ग्रामसभेला गैरहजेरी लावली. अर्जुन मळेकर वगळता इतर सर्व पंचसभासद गैरहजर राहिले. यामुळे आक्रमक बनलेल्या ग्रामस्थांनी पंचायतीच्या सचिवांना धारेवर धरले. यामुळे सदर ग्रामसभा होऊ शकली नाही.
सदर ग्रामसभा 20 डिसेंबर रोजी घेण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली व यासंदर्भातील नोटीस जारी करण्यात आली . ही ग्रामसभा पुन्हा सोमवार 20 डिसेंबर रोजी घेण्यात आली .मात्र पुन्हा एकदा अर्जुन मेळेकर वगळता इतर सर्व पंच सभासदांची गैरहजेरी राहिली . यामुळे संतप्त बनलेल्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले. पंचायतीच्या समोर दिवसभर आंदोलन करण्यात आले. या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला दोन दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
भाजपवर विश्वास ठेवू नका : शशिकांत सावर्डेकर
दरम्यान, यासंदर्भात बोलताना आंदोलन समितीचे निमंत्रक शशिकांत सावर्डेकर यांनी सरकारवर चौफेर टीका केली. सरकारने गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सदर आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. यामुळे भाजप सरकार हे जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला .अशा सरकारवर जनतेने विश्वास ठेवू नये असे स्पष्ट करून सरकारचा निषेध केला.
भाजपला मतदान नको : शंकर नाईक
समितीचे पदाधिकारी शंकर नाईक यांनी सरकारच्या अनेक घोषणांवर आरोप करताना सरकार सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट केले. .सरकार अनेक ठिकाणी सरकार तुमच्या दारी हा उपक्रम राबवित आहे .सरकारला जर हिंमत असेल तर सरकारने शेळ मेळावली या ठिकाणी हा उपक्रम राबवून दाखवावा, असे थेट आव्हान शंकर नाईक यांनी दिले व येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपाला जनतेने मतदान करू नये, असे स्पष्ट करून हे आंदोलन जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा दिलेला आहे.
ही लोकशाहीची थट्टा
दरम्यान, 19 डिसेंबर या गोवा मुक्ती दिनाच्या हीरक महोत्सवादिनी पंच सभासदांनी पंचायतीच्या सभागृहांमध्ये ध्वजारोहणासाठी उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र सदर ध्वजारोहण उपसरपंच नितेश गावडे यांनी केले. उर्वरित पंच सभासदांना गोवा सरकारच्या मुक्तीदिनाचे काहीच पडलेले नाही, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.ही लोकशाहीची थट्टा असून लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची थट्टा करणे हे लोकशाहीसाठी मारक असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेक आंदोलनकर्त्यांनी व्यक्त करून तीव्र निषेध केला.