तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
दहावी नंतरच्या शिक्षणासाठी एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून देण्यात येत असलेल्या शिष्यवृत्तीमध्ये पाचपटीने वाढ करण्यात आली आहे. देशातील 4 कोटी विद्यार्थ्यांकरीता यापूर्वी 1100 कोटींची तरतूद होती. त्यात वाढ करीत सन 2026 पर्यंत वर्षाकाठी 6 हजार कोटींची तरतूद केली आहे. याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती खा. जयसिध्देश्वर महाराज यांनी दिली. शेळगी येथील मठामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खा. जयसिध्देश्वर महाराज बोलत होते.
खा. जयसिध्देश्वर महाराज म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थित मंत्रीमंडळ समितीमध्ये या वाढीव शिष्यवृत्तीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची गोडी वाढावी. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणामध्ये व्यत्यय येऊ नये, याकरिता शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 1 हजार 100 कोटींवरून थेट 6 हजार कोटी रुपये इतकी करण्यात आली असून यामध्ये पाच पटींची वाढ आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षण उन्नतीचा असल्याची भावनाही खा. जयसिध्देश्वर महाराज यांनी यावेळी व्यक्त केले.
सोलापूरसाठी केंद्र शासनाकडे हे विषय प्रस्तावित
गेल्या आठवड्यामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची व्हिसीद्वारे चर्चा झाली. त्यांच्याकडे विविध मागण्या केल्याचे खा. जयसिध्देश्वर महाराजांनी सांगितले.
- सोलापूर स्थानकासाठी विद्युतकरण त्वरित व्हावे.
- सोलापूर-दिल्ली नव्या रेल्वेची मागणी केली. सध्या कर्नाटक ते दिल्लीसाठी धावणारी केके एक्सप्रेस एकच रेल्वे आहे.
- मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन सर्व्हे चालू आहे. या ट्रेनला सोलापूरचा थांबा मिळावा.
- अत्याधुनिक सुविधा असलेली 40 वंदे भारतम् रेल्वे गाड्या संपूर्ण देशात सुरू करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. त्यातील एका गाडीची सोलापूरसाठी मागणी केली आहे. या गाड्यांमध्ये तीन तासात मुंबईला पोहचण्याची क्षमता आहे.
चिमणीला पर्याय शोधला पाहिजे..
श्री सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. त्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा. चिमणी पाडाणे हा मुख्य हेतू न ठेवता त्याचे स्थलांतर होते का? चिमणीला काही पर्यायी मार्ग आहेत का? याचा अभ्यास करावा. सोलापूरच्या प्रगतीसाठी दूरदृष्टी ठेवून प्रशासने कार्यवाही करावी, अशी स्पष्टोक्ती सोलापूर विमानसेवेसंबंधी विचारणा केले असता बोलले.
भक्तांसाठी यात्रा खुली करावी..
श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला 900 वर्षांची परंपरा आहे. शासनाने नियम व अटी घालून भाविकांना यात्रेचे दर्शन घेण्याकरिता परवानगी द्यावी. परंपरेनुसार धार्मिक कार्य झाले पाहिजे. शासनाचे नियम व अटी घालून भक्तांसाठी यात्रा खुली करावी, असेही खा. जयसिध्देश्वर महाराज म्हणाले.