राज्यात शुक्रवारी 3,220 जण कोरोनामुक्त : 46 बळी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा कहर झाला असून रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. राज्यात शनिवारी 7,955 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 5,576 रुग्ण हे बेंगळूर शहर जिल्हय़ातील आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांमध्ये राज्यात 3,220 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 20 दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात भर पडताना दिसत आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी राज्यात 1,500 पेक्षा जास्त रुग्णांची भर पडली. राज्यात शुक्रवारी तब्बल 1,35,163 कोविड चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण 5.88 टक्के इतके आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 53,45,480 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 10,48,085 बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9,77,169 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 12,813 जणांचा बळी गेला आहे. सध्या 58,084 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 378 रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.
बेंगळूर शहर जिल्हय़ात शुक्रवारी सर्वाधिक 5,576, गुलबर्गा जिल्हय़ात 211, म्हैसूर 283, चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ात 119, मंगळूर 115, हासन 153, मंडय़ा 104, तुमकूर 145, विजापूर 127 नवे रुग्ण आढळले आहेत. उर्वरित जिल्हय़ांमध्ये शंभरपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.