स्पीडस्टार शार्दुल ठाकुरचे दुसऱया टी-20 सामन्यानंतर प्रतिपादन
इंदोर / वृत्तसंस्था
गोलंदाजीतील विविध पैलूवर बरीच मेहनत घेतल्यानंतर व त्यात सातत्य ठेवल्यानंतर या दोन वर्षांच्या कालावधीत मी अधिक सरस टी-20 गोलंदाज ठरलो आहे, असे स्पीडस्टार शार्दुल ठाकुर येथे म्हणाला. 22 महिन्यानंतर आपली पहिलीच टी-20 लढत खेळत असताना शार्दुलने 23 धावात 3 बळी असे पृथक्करण नोंदवले.
शार्दुल ठाकुर यापूर्वी 2018 मध्ये लंकेत संपन्न झालेल्या निदाहास चषक स्पर्धेदरम्यान बराच महागडा ठरला. प्रतिस्पर्धी फलंदाजांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. पण, आता आपण आपल्या गोलंदाजीत व्यापक सुधारणा केल्या आहेत, असा त्याचा दावा आहे.
‘टी-20 क्रिकेट हा खूपच छोटा प्रकार आहे. त्यात बरेच चढ-उतार प्रत्येक खेळाडूच्या वाटय़ाला येतात. जितके जास्त आपण खेळतो, तितका अनुभव आपल्याला मिळतो आणि आपण यातूनच शिकत जातो. प्रथमश्रेणी क्रिकेट कसोटी क्रिकेट हे असे दोन प्रकार आहेत ज्यामध्ये आपल्याला विचार करण्यासाठी बराच वेळ असतो. पण, टी-20 मध्ये तसा वेळ मिळत नाही असे शार्दुल ठाकुर येथे म्हणाला.
‘आयपीएल स्पर्धेत सातत्याने खेळत असल्यामुळे मला टी-20 क्रिकेटमध्ये बऱयापैकी यश मिळवता आले’, असे त्याला वाटते. ‘ज्यावेळी एखादा खेळाडू सराव करतो, त्यावेळी आपल्या बलस्थानावर विशेष लक्ष केंद्रित असते आणि चुका दुरुस्त करत, त्रुटी दूर सारत, कौशल्य विकसित करणे यावर भर द्यावा लागतो. मी मागील काही वर्षात त्यावरच भर दिला आहे असे शार्दुल येथे म्हणतो.
गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचे मार्गदर्शन आपल्यासाठी महत्त्वाचे ठरले याचाही तो उल्लेख करतो. ‘सध्याच्या घडीला मी भारतीय संघातून आत-बाहेर स्वरूपाचा प्रवास करत असल्यामुळे एकाच प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. काही वेळा मी मुंबईकडून खेळतो. नंतर चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतो आणि सध्या मी भारतीय संघातून खेळत आहे. त्यामुळे एकच प्रशिक्षक निवडता येत नाही. मात्र, भरत अरुण माझ्यासाठी खूप मोलाचे योगदान देत आले आहेत असे शार्दुलचे मत आहे.
श्रीलंकेविरुद्ध दुसऱया टी-20 सामन्यातील 19 व्या षटकात शक्मय तितके निर्धाव चेंडू निर्धाव टाकणे, हेच लक्ष्य होते असे तो गेमप्लॅन बद्दल बोलताना म्हणाला. ‘इंदोरमधील ती खेळपट्टी अतिशय उत्तम होती. त्यावर 170 ते 180 धावा जमवल्या जाऊ शकत होत्या. पण तरीही ही निर्धाव चेंडू टाकण्यावर माझा भर होता आणि त्यात मला सुदैवाने यश मिळाले’, याचा त्याने शेवटी उल्लेख केला.