नवी दिल्ली : मागील वर्षी देशात झालेल्या 4.49 लाख रस्ते दुर्घटनांपैकी सुमारे 71 टक्के दुर्घटना भरधाव वाहनांमुळे झाल्या आहेत अशी माहिती संसदेला शनिवारी देण्यात आली आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी राज्यसभेला एका लेखी उत्तरादाखल ही माहिती दिली आहे.
2019 मध्ये रस्ते दुर्घटनांचे एकूण प्रमाण 4,49,002 इतके आहे. यातील 3,19,028 रस्ते दुर्घटना (71.1 टक्के) वाहन भरधाव चालविल्याने झाल्या आहेत. मंत्रालयाने शिक्षण, अभियांत्रिकी, अंमलबजावणी आणि आपत्कालीन देखभालीच्या आधारावर रस्ते सुरक्षेच्या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी एक बहुस्तरीय रणनीती तयार केली आहे. भारतात दरवर्षी सुमारे 5 लाख रस्ते दुर्घटना होतात. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. या दुर्घटनांमध्ये सुमारे 1.5 लाख लोकांना जीव गमवावा लागतो. तर सुमारे 3 लाख लोक अपंग होत असल्याची माहिती सिंग यांनी दिली आहे.