वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 30 लाखांपेक्षा कमी विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली आहे. 2019 च्या तुलनेत यादरम्यान सुमारे 75 टक्क्यांची घट दिसून आली आहे. केंद्र सरकारने यासंबंधीची माहिती मंगळवारी संसदेत दिली आहे.
2019 मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या 1 कोटी 93 लाख इतकी होती. तर 2018 साली हा आकडा 1.56 कोटी होता. 2017 मध्ये पहिल्यांदाच एका वर्षात एक कोटीपेक्षा अधिक विदेशी पर्यटकांनी भारताचा दौरा केला होता. त्यावर्षी हा आकडा 1.4 कोटी होता असे केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी राज्यसभेत लेखी उत्तरादाखल सांगितले आहे.
मागील वर्षी 26 लाख 80 हजार विदेशी पर्यटकांनी भारताचा दौरा केला आहे. या कमी झालेल्या संख्येमुळे झालेल्या नुकसानीचे आकलन करण्यासाठी कुठलेच अध्ययन करण्यात आलेले नाही. पण उद्योगाशी संबंधित लोकांशी झालेल्या विचारविमिनयात उत्पन्न, विदेशी चलन आणि रोजगाराच्या मोर्चावर मोठे नुकसान झाल्याचे संकेत मिळाले आहेत. हे क्षेत्र अत्यंत असंघटित आहे. देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे आणि संबंधित घटकांना वित्तीय मदत प्रदान करण्यासाठी मार्केट डेव्हलपमेंट असिस्टेंसच्या (एमडीए) योजनेत दुरस्ती करत कमाल लाभ प्रदान करण्याची तरतूद करण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहे. यात ऑनलाईन प्रचार, वित्तीय मदतीची मर्यादा वाढविणे हे निर्णय सामील आहेत. राज्ये अणि केंद्रशासित प्रदेशांचे पर्यटन विभागही या योजनेच्या अंतर्गत वित्तीय मदत प्राप्त करण्यासाठी पात्र असल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे.