विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला सवाल
प्रतिनिधी / आचरा:
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱयावर आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आचरा जामडुल बेटावरील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्या कोकणाने शिवसेनेला नेहमी भरभरून दिलं, त्या कोकणकडे शिवसेनेने पाठ फिरवली असल्याचे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले.
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात करू नये. गतवर्षी निसर्ग वादळावेळी जाहीर केलेली मदत अजून लोकांना मिळालेली नाही. निदान आता तरी लोकांना मदत मिळावी. सलग दुसऱया वर्षी कोकणात चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. काहीही झालं, की केंद्र सरकारकडे बोट दाखवायची सवय या सरकारला झाली आहे. वादळामुळे उत्पन्न देणारी झाडे नष्ट झाली आहेत. मासेमारी नौकांचे नुकसान झाले आहे. आज शेतकरी आणि मच्छीमारांच्या डोक्यावर मोठी कर्जे आहेत. वादळात बोटी फुटल्या. झाडे जमीनदोस्त झाली. हे सर्व निर्माण करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. आज सरकारने त्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. शेतकरी व मच्छीमारांची कर्जे सरकारने तात्काळ माफ करावीत आणि त्यांना भरघोस मदत द्यावी, याकरिता आपण आवाज उठविणार आहोत. ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा एवढा तीव्र आहे, की यात जवळ-जवळ बाराशे गावे विजेविना अंधाराच्या खाईत लोटली गेली आहेत. केंद्र शासनाने किनारपट्टी भागात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम हाती घेतले आहे. राज्य शासनाने केंद्र सरकारची मदत घेऊन वीज वाहिन्या भूमिगत करून घ्याव्यात.
जामडुल बेट संरक्षक बंधारा मार्गी लावणार!
फडणवीस म्हणाले, जामडुल बेटाला संरक्षक बंधारा नसल्याने दरवेळी पूरस्थितीला सामोरे जावे लागते. वाडीतील पिण्याचे पाणी खारे होत असल्याने येथील ग्रामस्थांना शुद्ध पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. येथे लवकरात लवकर बंधारा आणि खाडीतील गाळ उपसा करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर आणि आचरा ग्रामस्थ उपस्थित होते.