ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्राकडे 18 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याची मागणी केली आहे. 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तिने लस मागितली तर त्याला लस देण्यात यावी, त्यासाठी वयाची अट शिथिल करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
किमान महाराष्ट्रासारख्या कोरोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ देण्याची परवानगी द्यावी, असे अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याची ही मागणी योग्य असून केंद्राने प्रारंभी किमान महाराष्ट्रासारख्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या काही राज्यांमध्ये तरी नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या नव्या लाटेत तरुणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा 45 वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता 18 वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याची परवानगी असावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लस उत्पादकांशी चर्चा करून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी आणि सुरूवातीला महाराष्ट्रासारख्या अतिबाधीत राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी अधिकाधिक लसींची उपलब्धता करून द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.