ऑनलाईन टीम / चंदीगढ :
पंजाबमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्विनी कुमार यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आज सकाळी आपला राजीनामा पाठवला आहे. ते मागील 46 वर्षांपासून काँग्रेसचे सदस्य होते.
अश्विनी कुमार यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे की, राजीनाम्याबाबत विचार केल्यानंतर मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की, सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या प्रतिष्ठेनुसार मी पक्षाच्या बाहेर राष्ट्रीय कार्य अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. 46 वर्षांच्या मोठय़ा काळानंतर मी पक्ष सोडत आहे आणि आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी कल्पना केलेल्या उदारमतवादी लोकशाहीच्या वचनावर आधारित परिवर्तनवादी नेतृत्वाच्या विचाराने प्रेरित सार्वजनिक कारणाचा सक्रियपणे पाठपुरावा करण्यास उत्सुक आहे.
अश्विनी कुमार 2002 मध्ये पहिल्यांदा पंजाबमधून राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2004 आणि 2010 मध्येही अश्विनी कुमार पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्विनीकुमार यांच्याकडे कायदा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अश्विनी कुमार यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.