ऑनलाईन टीम / अहमदनगर :
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती.
माजी खासदार दिलीप गांधी यांचे आज (दि 17 मार्च) पहाटे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होत. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते. सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
दिलीप गांधी 1999 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते. 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख यांच्याकडून गांधींना पराभवाचा धक्का बसला होता.
त्यानंतर ते 2009 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2014 मध्ये तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी सुजय विखे यांना उमेदवारी दिली गेली. मात्र तरीही नाराज न होता त्यांनी पक्षाचे काम सुरुच ठेवले.