प्रतिनिधी / बेळगाव
शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले शेतकरी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांचे शुक्रवारी सकाळी आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. हिरेबागेवाडीजवळील चिक्कबागेवाडी या खेडय़ामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते उच्च शिक्षित असले तरी शेतकऱयांसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठविला होता. साध्या राहणीमानात नेहमीच त्यांचा वावर असे. खांद्यावर हिरवा टॉवेल आणि धोतर घालून ते आंदोलनामध्ये सक्रिय होत होते. दिसायला साधे असले तरी अधिकाऱयांबरोबर ते इंग्रजीत संभाषण करत असत.
शेतकऱयांच्या प्रश्नांसाठी लढा
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात ग्रामीण विकास राज्य मंत्रीपदी असतानाही त्यांनी शेतकऱयांच्या प्रश्नांसाठी लढा दिला होता.
मलप्रभा साखर कारखान्याच्या विकासासाठीही त्यांनी प्रयत्न केले. शेतकऱयांना न्याय मिळवून दिला. शेतकऱयांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली आहेत. त्यांच्या निधनामुळे शेतकऱयांचा एक नेता हरपल्याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. बाबागौडा पाटील हे 1989-94 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱयांची बाजू सरकारसमोर मांडली होती.त्यानंतर 1998 साली लोकसभा निवडणुकीमध्ये ते विजयी झाले. त्यानंतर त्यांना मंत्रीपदही मिळाले. या काळात त्यांनी बेळगावसह धारवाड या जिल्हय़ाला विशेष निधी मंजूर केला होता.