मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक, बेळगाव परिसरात श्रद्धांजली
प्रतिनिधी/ बेळगाव
काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार षण्मुखानंद तथा एस. बी. सिदनाळ यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. निधनसमयी ते 86 वर्षांचे होते. काही दिवसांपासून तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. बेळगाव लोकसभा मतदारसंघात सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला होता. भाषिक भेद न बाळगता सर्व समाजाशी एकरुप होणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त झाले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनीही शोक व्यक्त करुन सरळमार्गी, दक्ष व प्रामाणिक राजकारणी कालवश झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
एस. बी. सिदनाळ हे मूळचे बैलहोंगल तालुक्मयातील. सध्या ते महांतेशनगर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुशिला, शिवकांत व शशिकांत हे चिरंजीव, कन्या नंदिनी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 1971 आणि 1977 मध्ये बेळगाव मतदारसंघातून दोन वेळा खासदार झालेल्या ए. के. कोट्राशेट्टी यांना डावलून 1980 च्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार म्हणून सिदनाळ यांची निवड केली. खरे तर त्यांना कमी मते पडतील असा अंदाज काहींनी व्यक्त केला होता. मात्र पहिल्यावेळीच माजी खासदारांपेक्षा दुप्पट अर्थात 2 लाख 17 हजार 527 मते घेऊन ते निवडून आले होते. 1984 मध्ये 2 लाख 2 हजार 506, 1989 मध्ये 2 लाख 10 हजार 329 तर 1991 मध्ये 1 लाख 61 हजार 391 मते घेवून ते सलग चारवेळा विजयी झाले होते.
1996 ला उमेदवार बदलल्यानंतर त्यांची ही मालिका खंडित झाली तरी पक्षीय राजकारणात ते सक्रिय होते. काँग्रेसच्या जुन्या फळीतील नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी त्यांची जवळीक होती. सर्व भाषिकांचा नेता ही त्यांची ओळख त्यांनी भाषाभेद बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य दिल्यामुळेच निर्माण झाली होती. मराठी भाषिकांनी त्यांना वारंवार पाठिंबा दिला होता.
सर्व समावेशक नेता हरपला – किरण ठाकुर यांची प्रतिक्रिया
एस. बी. सिदनाळ यांच्या निधनाने एक सर्वसमावेशक नेता हरपल्याची प्रतिक्रिया तरुण भारतचे समूह प्रमुख किरण ठाकुर यांनी व्यक्त केली. 1980 मध्ये सिदनाळ यांनी गोकाकच्या धबधब्याप्रमाणे मते मिळविली होती. समितीचे आनंद गोगटे त्यावेळी त्यांच्या विरोधात उभे ठाकले होते. कोट्राशेट्टींना डावलून स्वतः इंदिरा गांधींनी ही उमेदवारी सिदनाळ यांना दिली होती. त्यामुळे ती निवडणूक नेहमीच स्मरणात राहण्यासारखी आहे. सिदनाळ यांच्या जाण्याने राजकारणाच्या क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे. सिदनाळ हे विविध दौऱयांवर जात असत. त्यांनी काश्मीरचा दौराही केला होता. काश्मीर हे वर्षातील सहा महिने हिरवेगार असते. परंतु बेळगावमध्ये वर्षभर हिरवेगार वातावरण पहायला मिळते. काश्मीरपेक्षा बेळगावचे हवामान चांगले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती, असेही किरण ठाकुर यांनी त्यांच्याबाबतीत आठवण सांगताना नमूद केले आहे.