ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीव गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावर असलेल्या वीरभूमी येथील राजीव गांधींच्या समाधी स्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनी फेसबुकवर एक पोस्टही केली आहे. यात म्हटले आहे की, एक धर्मनिरपेक्ष भारतच एक असा भारत आहे जो जिवंत राहू शकतो. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.’
दरम्यान, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान, 21 व्या शतकातील भारताचे शिल्पकार, दूरदृष्टीचे नेते, देशभक्त, भारतरत्न राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहताना आम्ही त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करतो.
राजीव गांधी यांनी 1984 ते 1989 या काळात देशाचे पंतप्रधान पद भूषवले होते. 1991 मध्ये निवडणुकीवेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली होती. राजीव गांधी यांचा जन्मदिन काँग्रेसकडून सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो.