ऑनलाईन टीम /कोलकाता :
वर्षाच्या सुरुवातीलाच ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणारे राजीव बॅनर्जी यांची आज तृणमूल काँगेसमध्ये घरवापसी झाली. त्रिपुरामध्ये झालेल्या जाहीर सभेदरम्यान टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत बॅनर्जी यांनी टीएमसीत प्रवेश केला. तसेच नुकताच भाजपचा राजीनामा देणारे आमदार आशिष ठाकूर यांनीही आज टीएमसीचा झेंडा हाती घेतला.
पक्षप्रवेशानंतर राजीव बॅनर्जी म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मला रोजगार निर्मिती आणि शेतीविषयक धोरणात्मक बदलांविषयी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र, ती पूर्ण झाली नाहीत. भाजपमध्ये प्रवेश करुन मी मोठी चूक केली होती. मात्र, पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आणि सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी मला पुन्हा पक्षात सामावून घेतले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.