वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण देशामध्ये शेतकऱयांचे आंदोलन छेडले जात असून शेतकऱयांच्या या आंदोलनाला भारताचे माजी राष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू यांनी आपला पूर्ण पाठिंबा दिला आहे. शासनाच्या नव्या कृषी कायद्याला शेतकऱयांचा कडवा विरोध असून शेतकऱयांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन संधू यांनी शासनाला केले असून त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार परत करण्याची तयारी दर्शवली आहे.
गुरुबक्षसिंग संधू यांनी तब्बल दोन दशकांच्या कालावधीत भारताच्या पुरुष मुष्टियुद्ध संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीसाठी भारतीय महिला मुष्टियोद्धय़ांनाही बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने मुष्टियुद्ध क्षेत्रात पहिल्यांदा ऑलिम्पिक पदक पटकाविले होते. या कामगिरीची दखल घेत गुरुबक्षसिंग संधू यांचा शासनातर्फे द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. देशातील शेतकऱयांच्या आंदोलनाला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपला पाठिंबा दर्शविला असून त्यामध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल कर्तारसिंग, अर्जुन पुरस्कार विजेता बास्केटबॉलपटू सज्जनसिंग चिमा तसेच अर्जुन पुरस्कार हॉकीपटू रजबीर कौर यांचा समावेश आहे.
दिल्लीच्या सरहद्दीवर सध्या पंजाब आणि हरियानातील हजारो शेतकरी आंदोलन छेडीत आहेत. शासनाच्या कृषी नव्या कायद्याविरोधात शेतकरी ठाम आहेत. गुरुबक्षसिंग संधू हे स्वत: शेतकरी असून शेतकऱयांच्या मागण्यांचा शासनाने गंभीर विचार करावा आणि या नव्या कृषी कायद्यामध्ये बदल करावा, असेही त्यांनी आवाहन शासनाला केले आहे.