जम्मू-काश्मीरमधील कार्यकाळ ठरला होता लक्षवेधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. जगमोहन हे दिल्लीचे उपराज्यपाल देखील होते. आणीबाणीच्या काळात त्यांना राजधानीच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आणीबाणीवेळी ते दिल्ली विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेली कठोर भूमिका देशात चर्चेचा विषय ठरली होती.
संजय गांधी यांच्या पसंतीच्या अधिकाऱयांमध्ये जगमोहन यांचे गणना व्हायची. जगमोहन यांचे कुटुंब फाळणीनंतर दिल्लीत स्थायिक झाले होते. 1989 मध्ये तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे अपहरण झाल्यावर केंद्र सरकारने जगमोहन यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. या नियुक्तीला फारुख अब्दुल्लांनी विरोध करत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राज्यात 6 वर्षांपर्यंत राहिलेल्या राष्ट्रपती शासनात बहुतांश काळ राज्यात तेच राज्यपाल म्हणून कार्यरत होते.
राज्यपाल म्हणून जगमोहन यांनी अनेक कठोर निर्णय घेत दहशतवाद्यांच्या विरोधात विशेष धोरण स्वीकारले होते. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार रोखण्याचा प्रयत्न यांच्याकडून झाला. जगमोहन हे दोनवेळा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल राहिले. तेथील फुटिरवाद, कलम 370 मुळे निर्माण झालेल्या समस्या आणि राजकीय कटासंबंधी त्यांनी दहकते अंगारे या स्वतःच्या पुस्तकात तपशीलवार विवेचन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याचे म्हटले आहे. जगमोहन यांचा जन्म 1927 रोजी हाफिजाबाद येथे झाला होता, हे शहर आता पाकिस्तानात आहे.