पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली : गोव्याच्या राजकीय, सास्कृतिक क्षेत्रात संस्मरणीय योगदान
प्रतिनिधी / पणजी
गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे बुधवारी निधन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुपारी व्टिटरद्वारे त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी मृदुला सिन्हा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
77 वर्षीय श्रीमती मृदुला सिन्हा या ऑगस्ट 2014 ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान 5 वर्षे गोव्याच्या राज्यपालपदी होत्या. त्यानंतर राज्यपालपदी सत्यपाल मलिक यांची नियुक्ती झाल्यानंतर सिन्हा बिहारमध्ये रवाना झाल्या होत्या. गोव्यात असतानाच त्यांची प्रकृती हळूहळू खालावत जात होती. राज्यपालपदी असतानाही त्यांनी आपली साहित्य सेवा चालूच ठेवली होती. गोव्यात त्या रममाण झाल्या होत्या. संस्कृतच्या तसेच हिंदी साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता.
27 नोव्हेंबर 1942 रोजी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे जन्मलेल्या मृदुला सिन्हा यांना बालपणापासूनच जनसंघाचे बाळकडू मिळाले होते. चांगल्या राजकारणी आणि उत्साही साहित्यिक अशी त्यांची ख्याती होती. गोव्यात राज्यपाल म्हणून येण्याअगोदर त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या. 25 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्या गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या होत्या. त्यांचे पती रामकृष्ण सिन्हा हे बिहार सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री होते.
पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटर संदेशाद्वारे ते म्हणाले की, जनसेवेला वाहून घेतलेल्या मृदुला सिन्हा अशी त्यांची ख्याती होती. साहित्य विश्वाबरोबरच कलाक्षेत्रात त्या फार निपुण होत्या. त्यांच्या निधनाने आपल्याला तीव्र दुःख झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
साहित्य, राजकीय योगदान संस्मरणीय : अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सायंकाळी मृदुला सिन्हा यांच्या निधनाची माहिती व्टिटरद्वारे दिली व त्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले. अमित शहा यांनी आपल्या दुखवटा संदेशात म्हटले आहे की, साहित्य क्षेत्रात आणि भारतीय जनता पार्टीसाठी मृदुला सिन्हा यांनी दिलेले योगदान स्मरणात राहण्यासारखे आहे, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
उपमुख्य़मंत्री बाबू कवळेकर यांनीही मृदुला सिन्हा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांना चालना दिली : राज्यपाल
महाराष्ट्राचे व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोव्याच्या माजी राज्यपाल मृदूला सिन्हा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांना चालना दिली. आपुलकीच्या वागण्यामुळे मृदूला सिन्हा यांनी जनमानसात आपला वेगळा ठसा निर्माण केला. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवितो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
मातृतुल्य व्यक्तिमत्त्व : मुख्यमंत्री
मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मृदुला सिन्हा यांच्या निधनाने आपल्याला धक्काच बसल्याचे म्हटले आहे. आपल्यासाठी त्या माते समान होत्या. त्या स्वतः कलासक्त साहित्याच्या सेवक होत्या. साहित्याच्या भोक्त्या होत्या. त्यांचे तळागाळातील कार्य हे नेहमीच वाखण्याजोगे होते. त्यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात मुख्य़मंत्र्यांनी आपल्या दुखवटा संदेशात मृदुला सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली.
सिन्हांचे योगदान आठवणीत राहण्याजोगे : श्रीपादभाऊ
गोव्याच्या माजी राज्यपाल तथा ख्यातनाम लेखिका श्रीमती मृदूला सिन्हा यांच्या निधनाची वार्ता ऐकून दुःख झाले. भाजपच्या ज्ये÷ नेत्या म्हणून त्यांनी पक्षाच्या बळकटीसाठी आणि समाजाच्या सेवेसाठी केलेले योगदान चिरंतन आठवणीत राहण्यासारखे आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या शोकात आम्ही सामील आहोत, असे केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
आमच्या मार्गदर्शक गेल्या : तानावडे
प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निधनाने एक साहित्यिक तसेच आमच्या मार्गदर्शक निवर्तल्या असल्याचे म्हटले आहे. मृदुला सिन्हा यांचे गोव्यावर मनापासून प्रेम होते. त्यांच्याकडे कोणतेही प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्या ऐकून घेत असत व चांगले मार्गदर्शनही करीत होत्या, असे तानावडे यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशाच्याच राष्ट्रीय जीवनाची हानी : वेलिंगकर
सिन्हा यांच्या निधनामुळे केवळ गोव्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्याच राष्ट्रीय जीवनाची हानी झालेली आहे. त्यांची कारकीर्द अतिशय समाजाभिमूख अशी राहिली. समाजाच्या तळागाळातील घटकांच्या प्रश्नांशी एकरुप होण्याचा प्रयत्न त्यानी केला. भारतीय तेजस्वी महिलांचे आदर्श जीवन मांडणारे साहित्य त्यांनी लिहिले. अनेक गोवेकरांना त्यांची जवळीक व आपुलकी लाभली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना, अशा शब्दांत राज्य संघचालक, भारतमाता की जय संघ, गोवाचे प्रा. सुभाष भा. वेलिंगकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.