मलप्पुर/प्रतिनिधी
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (rahul gandhi) केरळच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपावर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आपला घणाघात सुरूच ठेवला आहे. राहुल गांधी सध्या केरळच्या (kerala) दौऱ्यावर असून केरळमधील मलप्पुरममध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi prime minister of india) यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या एकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी घाव घालत असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
मलप्पुरममध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ते (मोदी) म्हणतात भारत हा एक प्रदेश आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे लोक आहेत, नातेसंबंध आहेत. ही हिंदूंची मुस्लिमांसोबतची नाती आहेत. मुस्लिम आणि शिखांमधली, तामिळ-हिंदी-उर्दू-बंगालीमधली नाती आहेत. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेप हा आहे की ते ही नाती तोडत आहेत.” राहुल गांधी केरळच्या दौऱ्यावर असून त्यांनी केरळमधील मलप्पुरममध्ये बोलताना मोदींवर घणाघात केला.
“जर भारतीयांमधली नाती पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडत असतील, तर ते ‘भारत’ या संकल्पनेवरच आघात करत आहेत. म्हणून मी त्यांना विरोध करतोय. आणि त्याचप्रकारे, जर ते भारतीयांमधील नाती तोडत असतील, तर भारतीयांमधला दुवा पुन्हा एकदा उभा करणं हे माझं कर्तव्य आणि बांधिलकी आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.