अध्याय दहावा
भगवंत म्हणाले, उद्धवा त्रिगुणांच्या प्रभुत्वामुळे प्रत्येक मनुष्य एकाच प्रसंगात वेगवेगळा वागतो. तसेच प्रत्येकाचा चेहरामोहरा वेगळा असतो म्हणून प्रत्येकाचा आत्मा किंवा प्रत्येकातील आत्मतत्त्व वेगवेगळे आहे असे भासते पण प्रत्यक्षात एकच परमात्मा श्रीहरि हा चराचरामध्ये भरून राहिलेला आहे.
ज्याप्रमाणे बहुरूपी एकाच देहाने अनेक सोंगे घेतो पण तितके काही त्याचे देह नसतात. त्याप्रमाणे सच्चिदानंद श्रीहरि हा आत्मरूपाने चराचरामध्ये एकच असून अनेक रूपांनी भासतो. उद्धवाने हे सर्व समजून घेतले आणि त्याच्या मनात एक शंका आली ती भगवंतांना विचारताना तो म्हणतो, देवा, तूच म्हणतोस की जीव किंवा आत्मा हा ‘परतंत्र’ आहे आणि आता म्हणतोस की, अद्वैत म्हणजे देह व आत्मा हे दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे आत्मा ‘स्वतंत्र’ आहे. हे बोलणे परस्परविरुद्ध वाटते. ते खरे कसे मानावे ?
अद्वैतपण प्रतिपादन करतोस आणि तुझे इतरांना भय आहे असे म्हणतोस, हे काही पटत नाही कारण, अद्वैत म्हणजे सर्व एकच आहे तर कुणी कुणाला का भ्यायचे?
उद्धवाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणाले, आत्म्यावर त्रिगुणांची आवरणे चढलेली असतात. आत्मा त्रिगुणात्मक प्रकृतीशी जो जो तादात्म्य पावतो, तो तो प्रत्येकाचा आत्मा निराळा असा अनेकत्वाचा भास होऊ लागतो. आत्म्याचे अनेकत्व भासू लागले की, तेथे परतंत्रता आलीच. त्यामुळे प्रत्येक मनुष्य वेगवेगळा वागतो. आत्म्यावर त्रिगुणात्मक प्रकृती ताबा मिळवते त्यामुळे आत्म्याचे तेथे काही चालत नाही. थोडक्मयात आत्मा हा शरीराच्या कैदेत रहात असतो. शरीरात असूनसुद्धा काहीही करू शकत नाही.
म्हणून ईश्वराला सर्वांचे नियंत्रण करावे लागते. ईश्वराची नियामक सत्ता पाहिली की, साऱया जीवांना तिची भीती वाटते. माझ्या ईश्वरी सत्तेच्या भीतीने माणसेच काय यमसुद्धा थरथरा कापतो. मग इंद्रादिकांची काय कथा? ब्रह्मदेवालासुद्धा माझा धाक वाटतो. म्हणून अनेकत्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत काळाचे भयही अटळ आहे आणि हे अनेकत्व जेव्हा नाहीसे होते तेव्हा काळाचेही काम संपते आणि तो नाहीसा होतो. मग भय ते कशाचे? पर म्हणजे दुसरा कोणी नसला म्हणजे परतंत्रही आपोआपच संपते आणि एकत्वामधला स्वानंद उरतो. ज्याचा आपपर भाव मिटलेला असतो त्याच्या हे एकत्व लक्षात येते. त्याला आत्मज्ञानामुळे कित्येक पटीत स्वानंद उपभोगावयास मिळतो. त्या आनंदाची तुलना कशाशीच कधी करता येत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ‘काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ.’ आत्मज्ञानामुळे त्यांचे काळाचे भय संपले असे ते सांगतात. ज्यांच्या ठिकाणी गुणवैषम्य असते, तेच लोक भोगांविषयी आसक्त असतात असे समज. तेच देहाने यागादिक कर्मे करून भोगाचे स्थानही मिळवितात परंतु तेथून त्या याज्ञिकांना पतन होण्याचा धाक असतोच. तेव्हा तो लोकही अशाश्वतच आहे आणि आपला लोकही अशाश्वतच आहे हे लक्षात येऊन त्या लोकाचा अधिपतीही दुःखातच असतो.
जखमी झालेल्या मनुष्याला चाबकाने मारले असता जसे असह्य दुःख होते, त्याप्रमाणे जन्ममरणाच्या फेऱयात गिरक्मया खाताना अतिशय दुःख होते व तो अघोर गर्भवास भोगतो. रहाटगाडग्याचे पोहरे एकदा रिकामे होतात, एकदा भरतात. त्याप्रमाणे हाही जन्मापासून मरणापर्यंत अविश्रम फिरतच राहतो. दोरामध्ये जसा सर्पाचा भास होतो, त्याप्रमाणेच हे चौदा लोक आहेत. ते सारे मायेचाच विलास असल्यामुळे, सुखाचा लेश तरी तेथे कशाचा? आणि शेवटी त्या सर्व लोकातून माघारी पाठवले जाते. गीतेत हा विचार आठव्या अध्यायात मांडला
आहे.
ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा ।
माझी भेट घडे तेव्हा जन्मणे मग खुंटले ।। 8.16।।
आता तू म्हणशील की जग तर सारे गजबजलेले दिसत आहे, त्याला मायिक कसे म्हणावे? त्याचे उत्तर तुला सहज रीतीने कळेल असे सांगतो.
क्रमशः