प्रतिनिधी/ शाहूपुरी
सातारा नगरपालिकेतर्फे केंद्र सरकारचे स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झाले आहे. राज्य शासनाकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत दि. 26 रोजी सकाळी सात वाजता गोलबाग (राजवाडा) येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्षा माधवी कदम व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे
यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. त्याअंतर्गत राज्य शासनाकडून माझी वसुंधरा अभियान सुरु करण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियान हा माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पहिला उपक्रम आहे. हा राज्यातील स्थानिक संस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी निसर्गाच्या
पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर) आधारित कृतीशिल उपक्रम आहे. आठवडय़ातून एक दिवस सायकलचा वापर करुन प्रदूषण विरहित वातावरण निर्माण करुन
वसुंधरेच्या सौंदर्यात भर घालण्याचा नगरपालिकेचा मानस आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत सातारा पालिका व बी. व्ही. दिक्षित सायकल डिलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ’प्रदूषण मुक्त सातारा’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास
मुख्याधिकारी अभिजीत बापट, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, आरोग्य विभाग प्रमुख सुहास पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सायकल रॅली गोलबागमोती चौक-पोलिस मुख्यालय मार्गे पोवईनाका-राजपथ-कमानी हौदमार्गे पुन्हा गोलबाग अशी काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. सहभाग घेणायांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. सातारकरांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.