चिं. वि. जोशी यांची वरील शीर्षकाची एक गोष्ट आहे. भोळसट चिमण कथेचा नायक आहे. सालाबादप्रमाणे तो रत्नागिरीत आलेला असताना एक म्हातारबुवा त्याला गाठून दूरचे नाते सांगतो आणि म्हणतो की मी आणि माझी पत्नी धनाढय़ व निपुत्रिक आहोत. राजापूरच्या पासोडेमहाराजांनी मला दृष्टांत दिला आहे की तुला दत्तक घ्यावे. तस्मात तूच आमचा दत्तक मुलगा हो आणि आमची इस्टेट ताब्यात घे. यंदाच्या पावसाळय़ात आम्ही दोघे तुझ्याकडे रहायला येतो. पावसाळा संपला की सगळी इस्टेट विकून तिची विल्हेवाट लावू. मग तू तुझ्या कारकुनी नोकरीवर लाथ मार आणि आपण ऐशोआराम करू वगैरे.
चिमण हुरळतो आणि घरी येऊन आईला सर्व सांगतो. आई त्याला सावध रहायला सांगते. पण चिमण तिला पासोडे महाराजांचा दाखला देतो. काही दिवसांनी चिमणचे दत्तक आईबाप होऊ घातलेले म्हातारा-म्हातारी ऊर्फ अण्णा-माई दारात दत्त म्हणून उभे राहतात. त्यांनी आपल्याबरोबर दागदागिन्यांनी आणि कपडय़ालत्त्यांनी भरलेल्या अवजड कुलूपबंद ट्रंका आणलेल्या असतात. ट्रंकांच्या किल्ल्या हरवलेल्या असल्याने चिमण त्यांना नवे कपडे करतो. ते रत्नागिरीच्या नोकरास पत्र लिहून डुप्लिकेट किल्ल्या मागवतात. तोवर चिमणच्या घरात अण्णा-माई छानछोकीत राहतात. चिमणच्या बँक खात्यातले पैसे संपतात. अण्णा नोकराला रजिस्टर्ड पत्र लिहून डुप्लिकेट किल्ल्या आणि 500 रुपये मागवतात. तोवर चिमण खर्चासाठी सासऱयांकडून उसने आणतो. पावसाळा संपल्यावर चिमण गुपचूप रत्नागिरीला जातो. अण्णा-माई हे जोडपे लबाड असल्याचे समजते. त्यांना पकडण्यासाठी तो घाईघाईने पुण्याला परततो. पण तोवर म्हातारा-म्हातारीने पोबारा केलेला असतो. त्यांनी मागे ठेवलेल्या ट्रंकांची कुलपे फोडल्यावर आत फक्त दगड भरलेले आढळतात. पोबारा करताना अण्णा-माईंनी इकडे तिकडे किरकोळ उधारीही केलेली असते.
@ @ @
तळटीप 1 -गोष्ट सहज आठवली म्हणून सांगितली आहे. कोकणातल्या लोकांनी पुणेकरांवर मात केली हे सांगून पुणेकरांना खिजवण्याचा हेतू नाही.
तळटीप 2 – दत्तक वडील म्हणजे दत्तक मुलाला लुबाडणारे म्हातारा-म्हातारी एवढेच मूळ लेखकास आणि अस्मादिकासही अभिप्रेत समजावे. दत्तक वडील म्हणजे कोरोनाच्या साथीत राजकारण करणारे, आपल्याला वाऱयावर सोडणारे पुढारी किंवा पालक मंत्री असे इथे सुचवण्याचा हेतू नाही.