नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. त्यानंतर चिराग पासवान यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून देखील हटवण्यात आल्याचं समोर आलं. या सर्व घडलेल्या घडामोडींवर चिराग पासवान यांनी मत मांडले आहे. हा लढा मोठा असून, कायदेशीर लढाईलाही तयार असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
चिराग पासवान माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, घऱातील गोष्टी बाहेर पडू नयेत, असे वाटत होते. मागील काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी घराबाहेर पडू शकलो नाही. मात्र माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत कट रचण्यात आला.
माझ्या वडिलांचे निधन झाले आणि लगेचच निवडणुका लागल्या. तो काळ आमच्यासाठी कठीण होता. मात्र, जनतेने आम्हाला चांगला पाठिंबा दिला व २५ लाखांहून अधिक मते आम्हांला मिळाली. जदयुमुळे आम्ही युतीतून बाहेर पडलो आणि स्वबळावर निवडणुका लढलो, असे चिराग यांनी यावेळी सांगितले. मी काकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न असफल ठरला. काकांनी इच्छा व्यक्त केली असती, तर त्यांना संसदीय दलाचे नेते केले असते, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
यासोबतच चिराग पासवान यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र देखील पाठवलं आहे.चिराग यांनी या पत्रात म्हटले आहे की, पक्षाचा संसदीय दलाचा नेता म्हणून पशुपती कुमार यांना मान्यता देण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार केला जावा. हा निर्णय पक्षाच्या धोरणाप्रमाणे नाही. पक्षाचा अध्यक्षच संसदीय दलाच्या नेत्याची निवड करू शकतो.” तसेच, चिराग यांनी लोकसभा अध्यक्षांकडे अशी विनंती देखील केली आहे की, लोजपाचा संसदीय दलाचा नेता म्हणून त्यांच्या नावाने परिपत्रक काढल जावं, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
तसेच काल, मंगळवारी चिराग पासवान यांनी एक भावूक ट्विट केलं होतं. वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र मी अयशस्वी ठरलो. पक्ष आई समान आहे आणि आईला धोका दिला नाही पाहिजे. लोकाशाहीत जनताच सर्वकाही आहे, पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो, असे म्हणत त्यांनी एक जुनं पत्र सार्वजनिक केले होते.