ऑनलाईन टीम / बीड :
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी एकेकाळी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला होता, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले.
बीड जिल्हा संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे ‘संविधन बचाव’ महासभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली असून काँग्रेस नेत्यांचा अपमान सहन करणार नाही, असे आव्हाडांना खडसावले आहे.
या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, बीडमध्ये केलेला भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहे. इंदिरा गांधींना अतिशय आदराने मानणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष नाही तर एक लोकचळवळ आहे. इंदिरा गांधींनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात.
आज अमित शाह आणि मोदींविरोधात तेच घडत आहे. इंदिरा गांधींइतकं कतृत्त्व कोणाचंच नाही. जर त्यांचा पराभव होऊ शकतो तर मोदी आणि अमित शाह कोण आहेत. इंदिरा गांधींचा समर्थक आहे हे सांगायला मला लाज वाटत नाही. इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाह यांच्याशी होऊच शकत नाही,असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.