औरंगाबाद/प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदार संजय राठोड त्यांनी वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा संजय राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसे वक्तव्य केलं आहे. त्यावर संजय राठोड यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राठोड यांच्या कॅबिनेटमधील पुनरागमनावर तर्कवितर्क लढवले जात आहेत
संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राठोड म्हणाले मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं राठोड यांनी सांगितलं.
तुम्ही सामंतांनाच विचारा
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी उदय सामंत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काही विधान केलं आहे. त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. ते माझे स्नेही आहेत. ते बोलले असतील. पण त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. मी काही बोलू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मी मंत्री व्हावा ही समाजाची इच्छा
दरम्यानतर राठोड यांचं पुनरागमन झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. चित्रा वाघ यांची प्रतिक्रियाही मी पाहिली नाही. त्यामुळे मी त्याबद्दल बोलू शकणार नाही, असं सांगतानाच मी मंत्री व्हावा ही माझ्या समाजाची अपेक्षा आहे. पण मी विधिमंडळाचा सदस्य आहे, समाजाचे प्रश्न सोडवत राहीन, असं त्यांनी सांगितलं.